Monday, October 31, 2011

निसर्ग प्रार्थना

कोकणातील शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे पारंपरिक शहरांचे रूप पालटत असले तरी विशिष्ट भागात गेल्यावर अस्सल कोकणी निसर्गाचा आनंद पर्यटकांना घेता येतो. रत्नागिरीहून पावसमार्गे लांजाला गेल्यास अरुंद वळणदार रस्ते, दाट झाडी, मधूनच दिसणारे काळ्याशार कातळावरील रानफुलांच्या सहवासात या भागातील अनेक प्राचीन मंदिरांना भेट देता येते. इथल्या मंदिरांच्या आकर्षक रचनेबरोबरच परिसरातील शांततेचा अनुभव आणि हिरव्या निसर्गाचे सान्निध्य रोमांचित करणारे असते.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करताना निसर्गाच्या सान्निध्यात मोकळे क्षण घालविण्यासाठी राजापूर आणि लांजा तालुक्यातील काही प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी पावसमार्गे भटकंती सुरू केली. भाट्येच्या समुद्र किनाऱ्याचे नेहमी वेगळे वाटणारे सौंदर्य निरखत आणि पुढच्या टप्प्यात दाट झाडीतून जाणाऱ्या वळणदार रस्त्यावरून प्रवासाची मजा लुटत पावसला पोहचलो. 

स्वामी स्वरुपानंद मठात दुपारची आरतीची वेळ होती. या मठातली स्वच्छता आणि काम करणाऱ्यांची सेवावृत्ती यामुळे पर्यटकांना सुखद अनुभव मिळतो. पर्यटकांसाठी असणाऱ्या सोईंसोबतच मठातली शिस्त चटकन लक्षात येते. आरतीच्या वेळेच्या मांगल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्यात असणारा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आरतीनंतर इथल्या प्रसिद्ध खिचडी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. मठाच्या बाहेरच्या बाजूस अत्यल्प दरात कोकम सरबत आणि चहा-कॉफीची सोय पर्यटकांसाठी करण्यात आली आहे. इथले पवित्र वातावरण आणि सुविधांमुळे जिल्ह्याच्या भेटीला आलेल्या पर्यटकांना दुपारच्या वेळी याठिकाणी भेट देऊन निवांत क्षण घालविण्यात वेगळाच आनंद मिळतो.

पावसहून कनकादित्य मंदिराकडे जाताना रस्त्यात पावसच्या खाडीचे विलोभनीय दृष्य पाहायला मिळतं. दाट सुरुचं वन, नारळ-पोफळीची दाट झाडी, रस्त्याच्या कडेला काजूची झाडे...'अद्भूत' या एकाच शब्दात याचं वर्णन करता येईल. खाडीवर बांधलेल्या पूलावरून जाताना एका ठिकाणी दाट झाडींच्या कॅनव्हासवर चितारल्या प्रमाणे एक लहान मंदिर पाण्याच्या मधोमध होते. ते दृष्य पाहताक्षणीच कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला गेला नाही.

रस्त्याने कोकणी पारंपरिक वाड्या, लाल मातीच्या डोंगरावरील हिरवा निसर्ग आणि नागमोडी वळणे मागे टाकीत कशेळी गावातील कनकादित्य मंदिरात पोहचलो. पावसपासून हे गाव साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना गावाच्या आणि गावातील मंदिराच्या सुंदरतेविषयी त्यांच्याकडून ऐकले होते. त्या वर्णनापेक्षा जास्त सौंदर्य या भेटीत अनुभवता आले...

... मंदिराची रचना अत्यंत सुंदर पद्धतीची आहे. दारातच तुळशी वृंदावनाची रांग जणू स्वागतासाठी सज्ज असते. महाद्वारातून आत जाताच संपूर्ण मंदिर परिसरात जांभा दगड खाली लावलेला दिसतो. मंदिराच्या सभोवती याच दगडाची भिंत आहे. प्रवेशद्वाराजवळच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंच उभारला आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपासमोर शंकर, विष्णू आणि आर्यदुर्गेची लहान मंदिरे आहेत. सभामंडपातील पताकांची शोभा पाहत राहवीशी वाटते.

कनकादित्याची मुर्ती ९०० वर्षे प्राचीन असल्याची माहिती इथल्या विश्वस्तांनी दिली. गुजरातमध्ये बाहेरील आक्रमणे होत असताना प्रभात पाटण येथून समुद्रमार्गे सुरक्षित स्थळी नेताना ती गावात पोहचल्याचे त्यांनी सांगितले. मंदिरात विहीरीच्यावर असलेल्या उंच लाकडी खांबाच्या रचनेकडे पाहून आश्चर्य वाटले आणि तेवढीच उत्सुकतादेखील. त्याला 'इंतर' असे म्हणत असल्याची माहिती मिळाली. झाडाच्या बुंध्याजवळच्या खाचेत मोठा लाकडी खांब व्यवस्थित अडकवून त्याच्या एका बाजूला जांभा दगडाचे ब्लॉक आणि दुसऱ्या बाजूला हनुमानाच्या गदेप्रमाणे प्लास्टिक अथवा धातूची रचना केलेली असते. याचा खालचा भाग अर्धा खुला असतो. विहिरीतून पाणी काढण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचे प्रात्यक्षिक अत्यंत रोचक वाटले. महाकालीच्या मंदिरातही अशीच रचना पहायला मिळाली. मंदिरात तांब्याच्या धातूपासून बनविलेले इतिहासकालीन ताम्रपट देखील पहावयास मिळतात. 

कनकादित्याचे दर्शन घेऊन आम्ही साडेतीन किलोमीटरवर असलेल्या आडीवरे गावाला पोहचलो. रस्त्यात व्येत्येचा सुंदर समुद्र किनारा आहे. मात्र वेळेचे नियोजन लक्षात घेता ते सौंदर्य मागे टाकीत प्रसिद्ध महाकाली मंदिरात पोहचलो. मंदिराचा परिसर भव्य आहे. नुकतेच नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. इथे महाकालीसोबत महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या मुर्तींचे दर्शन होते. मंदिराला लागूनच जुन्या पद्धतीची विहीर आहे. कोकणातील मंदिरांच्या वास्तू फारशा भव्य नसल्या तरी त्यांचे सौंदर्य मात्र नजरेत भरण्यासारखे असते आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे परिसरातील स्वच्छता आणि शांतता प्रार्थनेचा खरा आनंद देणारी असते. शहराच्या गजबजाटात मोठ्या वास्तू उभारताना ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या सहवासातील असा अनुभव घेता येत नाही. 

... महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही जाकादेवी येथे पोहचलो. अत्यंत डोगराळ भागातील आर्यदुर्गेचे जागृत देवस्थान म्हणून हे परिचित आहे. मंदिर परिसराचा शासनामार्फत विकास करण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती येथील पुजाऱ्यांनी दिली. मंदिर अत्यंत प्राचीन असून समोर अलिकडच्या काळात उभारण्यात आलेला सभामंडप आहे. दोन दगडी खांब मंदिर प्राचीन असल्याची साक्ष देत उभे आहे. मंदिर परिसरातच भाविकांच्या भोजनाची सोय करण्यात येते. पुण्याच्या भक्तांनी रस्त्याच्या कडेला भक्तनिवासाची उभारणी केली आहे. आर्यदुर्गा मंदिराला लागून गावदेवी श्री जाकादेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर हिरव्यागार डोंगरांची रांग दिसते. गार वाऱ्याच्या सुखद स्पर्शात काही क्षण इथे घालविण्याचा मोह आवरत नाही.

जाकादेवीहून लांजामार्गे परतीच्या रस्त्यावर अंजनारी गावातील निसर्गरम्य ठिकाणी आमच्या या सफरीचा सुंदर समारोप झाला. लांजाहून साधारण १५ किलोमीटर अंतरावर डावीकडे अंजनारी नदीच्या तटावर श्रीअवधूतवन दत्त मंदिर मठ उभारण्यात आला आहे. हिरव्यागार दाट झाडीने वेढलेल्या डोंगररांगातून वाहणाऱ्या नदीचे शांत पात्र, पक्ष्यांचे आवाज आणि मंदिर परिसरातील निर्मळता यामुळे प्रवासातील सर्व थकवा दूर सारला गेला. मंदिर परिसरात सुंदर उद्यान उभारण्यात येत आहे. खालच्या बाजूस नदीपात्रात जाऊन थंडगार पाण्याचा रोमांचीत करणारा स्पर्श झाल्यावर वरच्या बाजूस असणाऱ्या कुंडातील गरम पाण्याचा स्पर्श तेवढाच चकित करणारा असतो. निसर्गाची हीच किमया कोकणात वेगवेगळ्या रुपात अनुभवायला मिळते. नदी किनारी काही क्षण शांततेचा अनुभव घेतल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. या निसर्गाच्या सान्निध्यात 'निर्मात्या'च्या आठवणीत काही क्षण घालविणे प्रत्येकाला आवडतं. भक्तीतल्या एकरूपतेचा अनुभव इथले झाडे, वेली, पक्षी, नद्या, नाले आणि लालमातीचे रस्ते क्षणोक्षणी करून देतात. निसर्गाचा प्रेमळ स्पर्श झाल्यावर भावनांच्या सागरावर निर्माण होणारी प्रार्थनारूपी लाट विश्वकल्याणाच्या किनाऱ्याला केव्हा स्पर्श करते ते आपल्यालाही कळत नाही. तीच असते खरी प्रार्थना... निसर्ग प्रार्थना, विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना...एक मात्र खरं की अशा प्रार्थनेची एकरूपता अनुभवीत निसर्गाचा आनंदानुभव घेण्यासाठी शहराचा गजबजाट आणि व्यवहार विसरून सभोवतीच्या झाडे-वेलींनाच सोबती करायला हवं...आणि हो, हा अनुभव घेण्यासाठी कोकणात यायलाच हवं.

यश रोजगार मेळाव्याचे

राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना शासकीय नोकरी मिळेलच अशी शाश्वती नाही. कारण वाढणारी लोकसंख्या, संगणकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे शासकीय नोक-यांच्या संधी अल्प आहेत. अशाही परिस्थितीत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एम.एन.धाकड हे जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील उद्योगात कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना मोठया प्रमाणावर यशही आले आहे. 

सन २०१० ते ऑक्टोबर-२०११ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात राज्यातील वेगवेगळया कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन त्यांना धुळे जिल्हयातील उमेदवारांच्या मुलाखतीसाठी बोलावून मोठया प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.

धुळे जिल्हयात धुळे, शिरपूर, पिंपळनेर या ठिकाणी मोठया प्रमाणात रोजगार मेळाव्यांचे आयोजन करुन या दोन वर्षाच्या कालावधीत २,४५० बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिलेली असून ते धुळे, बारामती, शिरपूर, बडोदा, दोंडाईचा, वापी, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. अशा काम करणा-या युवकांनी नोंकरी करताना व्यवस्थापनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगून कामात समाधानी असल्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. 

रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांप्रती असलेले कर्तव्य व इतर बाबीबाबत थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे 

५३ हजार बेरोजगार उमेदवारांची नोंदणी 
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, धुळे येथे ५३,००० बेरोजगार उमेदवारांची नावे नोंदणी झालेली असून त्यात प्रामुख्याने अशिक्षित उमेदवारांपासून ते पदवीपर्यंतच्या सुशिक्षित उमेदवारांची नावनोंदणी केली जाते. परंतु शासकीय नोकरीचे प्रमाण पाहता प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला शासकीय नोकरी मिळेलच असे नाही. 

शासनाच्या नवीन रोजगार व स्वयंरोजगाराच्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळण्यासाठी शासकीय नोक-या, निमशासकीय नोक-या, स्वयंरोजगार योजना, रोजगार मेळावे आदी माध्यमांची अंमलबजावणी रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून करण्यात येते.

रोजगार मेळाव्याचे प्रभावी आयोजन- 
धुळे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील मोठ-मोठया कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी नियमितपणे संपर्क करुन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नावनोंदणी झालेले दहावी, बारावी, पदवीधर तसेच आय.टी. आय., तांत्रिक शिक्षण घेतलेले विभागाचे सुशिक्षित बेरोजगार व लहान-मोठे तांत्रिक कोर्स केलेल्या बेरोजगार उमेदवारांना मोठया प्रमाणात रोजगार मिळवून देण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची कंपनी व्यवस्थापनाकडून फसवणूक होऊ नये, त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठीही वारंवार चर्चा केली जाते.

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळण्यासाठी सन २०१० पासून आज पर्यंत जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी आठ रोजगार मेळावे भरवून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील नामांकित कंपनीच्या व्यवस्थापनेला सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना ४ हजार ८०९ उमेदवारांमधून २,४५० उमेदवारांची प्राथमिक निवड होऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून त्यात प्रामुख्याने २८ एप्रिल, २०१० रोजी पीआयजीओ व्हेईकल प्रा. लि. कंपनी, बारामती या कंपनीने आय.टी.आय. झालेल्या ५१७ तांत्रिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला. 

३ ऑगस्ट, २०१० रोजी बन्सवार सायंटिक लि. सुरत या कंपनीने शिरपूर आयटीआय मध्ये फक्त टेलरिंग काम करणा-या महिलां रोजगार मेळाव्यात ३१५ महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. तसेच १३ ऑगस्ट, २०१० रोजी बडोदा येथील अपोलो टायर्स व्यवस्थापनाने बी.एस.सी. /डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक, सिव्हील इंजिनिअरींग झालेल्या ५६ उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. दि. २७ ऑक्टोबर, २०१० रोजी पिंपळनेर येथील दीनदयाल आदिवासी सहकारी सूत गिरणीच्या माध्यमातून एस.एस.सी. व एच.एस.सी. उत्तीर्ण असलेल्या १५० आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर दि. २० नोव्हेंबर, २०१० रोजी दोंडाईचा येथील युनिव्हर्सल स्टॉर्च केम. अलाईड कंपनीत आयटीआय फिटर, डिझेल मेकॅनिक सिव्हील इत्यादी २१५ बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.

दि. २० एप्रिल, २०११ रोजी व्हेस्पा इंडिया प्रा. लिमिटेड, वापी येथील कंपनीने नावनोंदणी झालेल्या एस.एस.सी. व एच.एस.सी. १०५ सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून ३० जुलै, २०११ रोजी पीआयजी कंपनी, बारामती आयटीआय हेल्पर पदांकरिता ८२५ सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली तर दिनांक १२ ऑक्टोबर २०११ रोजी वेंकटेश्वर्या हेचरिंज प्रा.लि. पुणे मध्ये १००, धुळे येथील ओमशांती उद्योगात १७, उज्वल अटोमोबॉईल्समध्ये (टाटा मोटर्स) १५० अशा एकूण २६७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत झालेले असल्यामुळे जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना विविध प्रकारच्या कार्यालयीन सेवाही मिळतात. त्यात एस.एम.एस. द्वारे मुलाखतीची माहिती, नुतनीकरण आदि विविध उपक्रमही अधिकारी, कर्मचा-यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. 

  • जगन्नाथ पाटील 
  • गाजर गवत : गरज समूळ उच्चाटनाची

    अत्र तत्र सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.

    या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. त्यामुळे गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाची गरज लक्षात घेऊन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या सकल्पनेतून अमरावती येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मंडळींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

    राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून या घातक गाजर गवताचे उच्चाटनासाठी तीन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम संबंधित यंत्रणेनी राबवावा या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

    गाजर गवताची उत्पत्ती 

    मे‍‍‍‍क्सिको (अमेरिका) हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम पुणे येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली. या कार्यशाळेत सादरीकरणाव्दारे डॉ. भाले यांनी गाजर गवताचा पूर्वइतिहास, मानवी आरोग्यावर होणारे विपरित परिणाम, गाजर गवत कुठे आढळते, याविषयी सविस्तर प्रबोधन केले.

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी तज्ज्ञ डॉ. रत्नप्रसाद वासकर यांनी कार्यशाळेत माहिती देतांना सांगितले. की, राज्यात १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आपल्याकडे आले. हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले. 

    हे गाजर गवत, आम्लयुक्त, अर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरीही उगवते. पिकाची नासाडी, ॲलर्जी, चर्मरोग, श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे हे गवत उपद्रवी आहे मानले जाते.


    प्रतिबंधात्मक उपाययोजना

    आपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने सामूहिकरित्या मोहिम, उपक्रम घेण्यात आले तर ते शक्य आहे. 

    परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. डब्ल्यू. वडनेरकर यांनी गाजर गवताच्या प्रतिबंधात्मक उपायोजनाची माहिती दिली. गाजर गवताचे निर्मूलन करणे अत्यावश्यक असून. जैविक नियंत्रण पध्दतीनुसार मेस्किकेन भुंग्याव्दारे या गवतांवर नियंत्रण ठेवता येते. कारण विद्यापीठात करण्यात आली आणि त्याचे परिणामही अनुकूल दिसून आले. 

    या गवताच्या नायनाटासाठी तणनाशके महागडी असल्याने परवडत नाही. गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संशोधन सूरु झाले. या गवतावर २२ प्रकारच्या कीडी तात्पुरत्या स्वरुपात आढळतात. १९८३ मध्ये मेक्सीको भुंगा हा उत्तम प्रकारे नियंत्रक करु शकतो ही बाब संशोधनातून समोर आली. परभणी येथे कृषी विद्यापीठात या भुंग्याचे प्रजनन करण्यात येते. 

    नव्या जागेत हे भुंगे सोडण्याची प्रक्रिया सांगताना डॉ. वडनेरकर म्हणाले, शेतात प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडले पाहिजेत. हे भुंगे एका सच्छिद्र पॉलीथीन पिशवीतून आणून सोडावेत. प्रती भुंगा एक रुपया अशी त्याची किंमत आहे. 

    याशिवाय १०० लिटर पाण्यात २० किलो जाडे मीठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे तसेच तरोटा ही वनस्पती सुध्दा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात आणि या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी. 

    गाजर गवत निर्मूलनासाठी, नागरिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांनी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे. 

    अमरावती विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे प्रतिनिधी आदिंनी प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतल्यामुळे गाजर गवत उच्चाटनाची मोहिम यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. 

  • अशोक खडसे
  • कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

    ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचेच उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे. 
    उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात. 

    सदर बचतगटास काही तरी उदयोग करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच कालावधीत राज्य सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाकडून बचतगटाच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्ताव मागविले होते. या महामंडळाने कांदा बीज उत्पादनास प्राधान्य देण्याचें ठरवले. कारण नाशिक जिल्हयात कांदयाची मोठी बाजारपेठ असली तरी दरवर्षी कांदा बीज मिळविण्यासाठी शेतक-यांना नेहमीच अडचण येते. त्यामुळे कांदा बीज हा मुख्य प्रकल्प हाती घेतला. त्यादृष्टीने शहर परिसराचा अभ्यास केला. हा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीची आवश्यकता होती. परंतु जमीनीची किंमत लोक अव्वाच्या सव्वा सांगत होते. यावेळी बचतगटाच्या महिलांनी माविमच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक अधिकारी ज्योती निंभोणकर यांची भेट घेतली . त्यांना कांदा बीज शेती करावयाचे सांगितल्यावर ज्योती निभोणकर यांनी नायकवाडी परिसरास भेट दिली. चर्चेच्या अंती या बचतगटाच्या महिला सभासदाची एक एकर ३० गुंठे शेत जमीन कांदा बीज उत्पादनासाठी १० वर्षासाठी भाडे तत्त्वार घेतली. तसेच भाडयापोटी विहिर दुरुस्त करण्याचे देण्याचे ठरले.हा संपूर्ण खर्च एकंदरीत ४० ते ५० हजार रुपयापर्यंत होता. यासाठी माविमने २८ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले तर महिलांनी तेरा हजार रुपये जमा करुन एकुण ४५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा उपयोग कांदा बीज उत्पादनाची सामूहिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात येवुन शेतीचा उत्पादन काढण्यासाठी प्रगतीचे पाऊले पडू लागले. 

    महत्वाचे म्हणजे कांदा बीज लागवडीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव येथील द्राक्ष कृषी संशोधन केंद्रास महिलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यास राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले. या प्रतिष्‍ठानकडून परतीच्या बोलीवर बियाणे घेण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये कांदा लागवडीस सुरुवात झाली. बचतगटाच्या महिला सदस्यांना या कामासाठी पाठींबा मिळावा यासाठी त्यांच्या पतीची समज काढण्यात आली की यातून मिळणारा पैसा हा घरची आर्थ्रिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर महिलांना घरचा सदर उदयोग करण्यास उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. 

    कांदयाला जेव्हा पालवी फुटली तेव्हा आलेली पालवी काढून टाका म्हणजे नवीन पाने आल्यावर चांगले उत्पादन येते असे मत गावातील मंडळीनी व्यक्त केले. असा गैरसमज पसरवणारा सल्ला समन्वयक ज्योती निभोणकर यांना समजल्यावर त्यांनी महिलांची बैठक घेऊन कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कांदयाची पाने कापणे चुकीचे व अत्यंत धोकादायक असल्याचे स्पषट केले. कोणाचे ऐकण्यापेक्षा बचतगटाच्या सदस्यांनी माविम अथवा कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून असलेल्या अडचणी शंकाचे निरसन करावे असाही निभोणकर यांनी मोलाचा सल्ला दिला. या बचतगटाने इंटरनेट , वेगवेगळी पुस्तके, कृषी प्रदर्शने अशा माध्यमतून कांदा उत्पादना विषयी माहिती घेत या प्रकल्पाकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला सुरु केले. महिलांनी वेळोवळी कांदा बीज व्यवस्थेत यावे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. एनएचएफाआरडीच्या वतीने दर महिन्यास कांदयाच्या पिकाचे अवलोकन केले जाते. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज फळ आले कांदा बीज उत्पादनाची शेती या महिलांनी यशस्वीपणे करुन दाखविली . या हंगामात बचतगटास या शेतीव्दारे अडीचशे क्विंटल बीज हाती आले आहे. हे बीज त्यांनी कराराप्रमाणे एनएचएफआरडीकडे सूपूर्द केले असून त्यांची गुणवत्ता तपासून त्यांची रक्कम लवकरच त्यांची हाती पडेल. 
    ग्रामीण भागातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे येत असून उत्तम प्रकारे उदयोग करुन रोजगार उपलब्धतेबरोबर स्वावलंबी होण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर रोजगार मिळून स्वावलंबी होऊ शकतो. हे खरोखरच महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे. 

  • अशोक साळी 
  • Saturday, October 29, 2011

    पॉवर टिलर ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान

    भारत हा कृषी प्रधान देश आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत शेती करण्याच्या पध्दतीत परिस्थितीनुरुप बदल होत गेले. शेतीच्या विकासाच्या दृष्टीने हे सकारात्मक बदल आहेत. अधिक उत्पादन देणारे बी- बियाणे, सुधारित लागवड पध्दती, पीक संरक्षणाचे उपाय व शेतीचे यांत्रिकीकरण आदी बाबीचा येथे उल्लेख करावा लागेल. 

    फार वर्षापूर्वी शेतकरी हा लाकडाचा नांगराचा वापर शेतीच्या मशागतीसाठी करीत होता. यानंतर लोखंडी नांगराचा वापर करु लागला यासाठी बैलजोडी हे माध्यम होते. कालांतराने वाढत्या महागाईमुळे मजुरांची रोजंदारी वाढली, तसेच गुरांसाठी वैरणाची - चाऱ्याची कमतरता भासू लागली याचे परिणाम चाऱ्याचे दर वाढीवर झाले त्यामुळे शेतीसाठी बैलजोडी न परवडणारी झाली. शेतीसाठी आधुनिक यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाली. त्यापैकीच पॉवर टिलर उपयुक्त ठरु लागला.

    महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमिहीन कुटुंबाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत सन २००४-०५ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळालेली शेतजमीन कसण्यासाठी २० ते २५ हजार रुपयांची बैलजोडी खरेदी करणे तसेच तिच्या देखभालीचा खर्च परवडत नाही ही बाब लक्षात घेवून शासनाने या लाभार्थ्यांना पॉवर टिलर उपलब्ध करुन दिलेत. 

    अमरावती विभागात जून २०११ पर्यंत ७२६ पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले. यामध्ये अमरावती जिल्हयात १५६, अकोला १५६ , बुलढाणा १५६, यवतमाळ १६५ आणि वाशिम जिल्हयात ९३ लाभार्थींना हे पॉवर टिलर देण्यात आले. १०० टक्के अनुदानावर पॉवर टिलरचा पुरवठा करण्यात आल्यामुळे हा पॉवर टिलर लाभार्थींना वरदान ठरत आहे. 

    अशी आहे योजना 


    • या योजनेचा लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती किंवा नवबौध्द घटकातील असावा, त्याच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रुपये ४० हजार पेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक 

    • विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी इच्छुक अर्जदाराची यादी संचालक , समाजकल्याण पुणे यांचेकडे सादर करतील. उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदाराची संख्या जास्त असल्यास संचालक , समाज कल्याण हे पारदर्शक पध्दतीने लाभार्थ्यांना पॉवर टिलरचे वाटप करतात.

    • निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांची नावे व पत्ता संचालकांचे कार्यालयात, तसेच जिल्हयातील लाभार्थ्यांची नावे संबंधित जिल्हयाच्या विशेष जिल्हा समाज कलयाण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात येतात.

    • ज्या लाभार्थ्यांला पॉवर टिलरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्या लाभार्थ्याला या यंत्राची माहिती व ती चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दर करारावर असलेल्या संबंधित कंपनीकडे असल्याने संबधीत लाभार्थ्यांना कंपनीकडून व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले असल्याचे लेखी पत्र त्यांनी कंपनीला सादर करणे आवश्यक असते.

    • सदर योजनेचा लाभ निवडलेल्या लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे यासाठी पॉवर टिलर लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची मूळ पोच पावती व प्रशिक्षण मिळाल्या संबंधीचे लाभार्थ्यांचे पत्र विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यामार्फत संचालक समाजकल्याण यांना सादर करण्यात येते

    • संचालक समाज कल्याण यांनी मूळ पावती शासनाला सादर करतात. व शासनाने मान्यता दिल्यानंतर संचालक समाजकल्याण , पुणे हे सदर कंपनीला रक्कम महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन याचे मार्फत अदा करतात. 

  • शामलाल कास्देकर
  • Tuesday, October 25, 2011

    सेंद्रिय शुद्धता

    राज्य शासनातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती आणि त्यासाठी लागणाऱ्या खतनिर्मिती युनिटबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालगड गावातील कोंडविलकर कुटुंबाने चांगला गांडुळखत प्रकल्प उभारून शासनाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे.

    पुष्पा कोंडविलकर यांचेकडे पारंपरिक फळबाग आणि भाताची शेती होत असे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात येई. सेंद्रिय खताविषयी अधिक माहिती घेतल्यावर बाहेरून किंमत मोजून खत आणण्याऐवजी आपल्याच शेतात सेंद्रिय खताचे युनिट उभारण्याचे त्यांनी निश्चित केले. २००५ मध्ये श्री समर्थ गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोंडविलकर गुरुजींनी निवृत्तीनंतर या युनिटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. प्रकल्पाची गुणवत्ता चांगली असली तर भूमीपुत्राचे ऋण फेडण्यासाठी खत प्रकल्पाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा सूक्ष्म अभ्यास केला.

    गांडूळ सतत परिश्रम करणारा प्राणी आहे. त्याच्या सहवासाने कष्ट करण्याची प्रेरणा मिळते, असे गुरुजी नम्रपणे सांगतात. 'आपण कोणाचे मित्र सहजपणे होत नाही' असे सांगताना ते गांडुळाचे कार्य स्पष्ट करून सांगतात. कोंडविलकरांनी प्रारंभी तिसंगी येथून पाच हजार रुपयांचे १० किलो गांडूळ आणले. गांडुळांची देखभाल व्यवस्थित करण्यासाठी कचऱ्याचे बेड तयार करण्यात आले. त्यासाठी हत्ती गवत शेतातच लावण्यात आले. गवताची गुणवत्ता चांगली असण्यासाठी शेणखताची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी शोषले गेल्याने आणि पावसाळ्यात पाण्याद्वारे सर्व जैविक घटक वाहून गेल्याने बाहेरून मिळणारे शेण गवतासाठी फारसे पोषक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेणासाठी त्यांनी सहा गायी खरेदी केल्या. गाईंची संख्या आता १९ पर्यंत पोहोचली आहे.

    गाईचे शेण मिळाल्यावर त्यातील गुणवत्ता कायम रहावी म्हणून शेतातच शेडमध्ये टाक्यांची बांधणी केली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही शेणातील पौष्टिक तत्त्व कायम राहतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने गवताच्या डेपोवर गांडूळ सोडले जातात. ते गवत खाऊन खालच्या भागात जाताना खताची निर्मिती करतात. अत्यंत शुद्ध असलेले सेंद्रिय खत त्याद्वारे मिळते. शेतातल्या गड्याने खताचे कौतुक सांगताना चहापेक्षाही चांगले पाण्यात विरघळते, असे सांगत प्रात्यक्षिक करून दाखविले.

    कोंडविलकर गुरुजींच्या शेतातील प्रकल्पात एक लाख रुपये किंमतीचे सुमारे ५०० किलो गांडूळ तयार झाले आहेत. दीडशे बाय एकशे तीस फुटाच्या शेडमध्ये त्यांचे युनिट यशस्वीपणे सुरू आहे. गोठ्यातील गाईंचे शेण, मूत्र, दूध आदी सर्व बाबींचा पुरेपूर उपयोग व्यवसाय आणि प्रकल्पासाठी करण्यात येत आहे. गोमूत्राचा वापर हत्ती गवतावर फवारणीसाठी केला जातो. स्थानिक बाजारात ४०० ते ५०० रुपये टन दराने गांडूळ खताची विक्री होत आहे. दररोज गाईचे ७० लिटर दूध बाजारात विक्रीसाठी जाते.

    सेंद्रिय शेतीमुळे एकीकडे शेतातील उत्पन्न वाढत असताना जमिनीचा कसही वाढतो आहे. शिवाय या प्रकल्पामुळे शेताची गरज पूर्ण होऊन शिवाय खत विक्रीतून उत्पन्नात वाढदेखील झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अभ्यासाचा विषय बनला आहे. खताची गुणवत्ता चांगली असल्याने कृषि विद्यापीठाचे प्राध्यापक-विद्यार्थी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी येत असतात. शेतातील अशा लहान प्रकल्पातून कृषि व्यवसायाला मिळणारी दिशा महत्त्वाची असते, हेच या प्रकल्पाने सिद्ध केले आहे.

    हिम्मत हरली नाही म्हणून जिंकली !

    बचतगट म्हणजे नुसता आर्थिक कणा सक्षम करणारी चळवळ नव्हे तर तो आहे प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास !अशाच एका आत्मविश्वासाची कथा सांगत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाची सहयोगीनी कल्पना गजभिये.

    महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत रमाई स्वयंसहाय्य महिला बचत गट मु.वडेगाव, पो. मांढळ, ता. कुही येथे २९ मार्च २००४ रोजी गटाची स्थापना सहयोगीनी ताईच्या मदतीने झाली. गट स्थापन करतांना खूप अडचणी आल्या. अनंत अडचणीतून आमचा गट निर्माण झाला. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित अनेक कार्यक्रम (बैठका) मध्ये सर्व गावातील महिला एकत्रित आल्या. त्यामुळे आमची एकमेकींची ओळख दाट झाली. आणि संबंध जवळचे झाले.

    गटामुळे बँकेचे व्यवहार कळले. बचत झाली आणि माझ्याप्रमाणेच गरजू महिलांची अडचण दूर झाली. नंतर मी एलआयसी एजन्ट झाले सुरवातीला खूप अडचणी आल्या. लोकांशी बोलायचे कसे ? बाहेरगावी जाऊन लोकांच्या पॉलीसी काढायच्या कशा ? तसेच गावातील लोक वाईट शब्दात बोलायचे पण मी हिम्मत हारले नाही. जिद्दीने प्रयत्न करीतच राहीले.

    बचतगटामुळे माझा व्यवसाय वाढू लागला. गटामुळे संबंध जवळ आले. याची मदत एलआयसी व्यवसायाच्या कामात आली. गटामुळे हिम्मत वाढली आणि आज मी मोठ-मोठ्या ऑफीसमध्ये जाऊन पॉलिसीधारक करु लागले. माविमने मला बोलायला शिकविले माविमची भेट यापूर्वी झाली असती तर माझी जास्त प्रगती झाली असती.आज दोन हजार रुपये कमावून मी माझ्या कुटुंबाचे पालन करते

    जीवनात वादळं खूप आली. पण बचतगटामुळे सावरले. वेळोवेळी गटातून आर्थिक मदत झाली. म्हणून तर म्हणते माविमने मला पोटाशी धरलं आणि माझ्या संसाराचे संकट टळलं. माझ्या माविमने मला दूर लोटल नाही. मी माविमची सदैव ऋणी राहीन आता तर मी गावातील अन्य भगिनींना एलआयसी एजन्ट म्हणून काम करण्याबद्दल मार्गदर्शन करते. माझ्याप्रमाणेच माझ्या अन्य भगिनी जर एलआय सी एजन्ट झाल्या तर त्यांना भांडवल न गुंतवता या व्यवसायाच्या माध्यमातून कमिशन मिळेल. व आपला चरितार्थ अतिशय चांगल्या प्रकारे करून समाजात ताठ मानेने जगता येईल.

    याकरिता गरज आहे, ती जिद्दीची, संघर्षाची, फिरण्याची आणि वाट पाहण्याची. संधी आपल्या जवळच आहे तिचं सोनं करा माविम आपल्या पाठीशी आहे. माविमच्या आधारावर पुढचे पाऊल टाका म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सापडेल.

    तेव्हा माविमच्या लेकींनो पुढे हरू नका आपल्याला जिंकायचे आहे. जिंकायचे आहे माझ्यात जिद्द होती म्हणून मी हरली नाही. म्हणून जिंकले !

    वनौषधींनी नटलेली मेळघाटची अनोखी पाऊलवाट

    मेळघाटच्या निसर्गरम्य आणि समृध्द वनक्षेत्राची सफारी करताना केवळ वन्यजीवाचे अस्तित्व पहाणे एवढ्यावरच न थांबता जैवविविधतेने नटलेल्या आणि वनौषधींनी परिपूर्ण असलेल्या जंगल सफारीची सुरुवात आमडोहच्या निसर्ग पाऊलवाटेनी केल्यास समृध्द वनखजिना निसर्गप्रेमींना निश्चितच अनुभवायला मिळतो.

    वनविभागातर्फे चिखलदरा तसेच सेमाडोह वनक्षेत्रातील वन्यजीवांचे संरक्षण तसेच वनांच्या संवर्धनासाठी वनकर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी आमडोह ते बंदरकहू आणि पुढे पिली या गावापर्यंत वनभ्रमण आयोजित केले होते. या वनभ्रमणामध्ये मुख्य वनसंरक्षक डॉ. मोहन झा, राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाचे सदस्य किशोर रिठे, उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे, चिखलदरा वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस.एम. बेदरकर यांच्यासह निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. सोळा किलोमीटरच्या जंगल सफारीमध्ये वनौषधीस‍ह विविध प्रजातींची फुले दुर्मिळ वृक्ष, वेली तसेच वन्यजीवांची ओळख अगदी जवळून पाहण्याचा अभिनव उपक्रम वनविभागाने उपलब्ध करुन दिला होता.

    चिखलदरा येथील वन विश्रामगृहापासून सुरु झालेल्या वन पदभ्रमण मोहिम सेमाडोहकडे जाणाऱ्या आमडोह फाट्यावरील निसर्ग पाऊलवाटेने सुरुवात झाली. मेळघाटचे जंगल केवळ गाडीत बसूनच अनुभवता येत नाही याचा प्रत्यही या जंगल सफारीमध्ये क्षणोक्षणी अनुभावायला मिळाला. वाघ पाहणे किंवा वन्यजीव दृष्टीस पडणे हाच केवळ या मोहिमेचा उद्देश नव्हता. आमडोह परिसरातील बोरखेडी क्षेत्रात तसेच चिखलदरा रेंजमध्ये दहा ते बारा वाघ आहेत. वाघ असल्याबदृदलच्या नोंदी कॅमेरामध्ये ट्रॅप झाल्या आहेत. संपूर्ण मेळघाटात वाघांची संख्या वाढत असल्याचे पुरावे वनविभागानेही गोळा केले आहे. वन्यजीवांच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नासोबतच त्यांच्या अधिवास क्षेत्राचे संरक्षण केल्यास वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठयात प्रमाणात वाढ होऊ शकते. हे वनविभागाने सिध्द करुन दाखविले आहे.

    मेळघाट परिसररात दुर्मिळ वनस्पती आहेत. या वनस्पतींची ओळख येथील आदिवासींना असल्याने त्यांच्याकडून या माहितीचा खजिना वनरक्षक गोळा करतांना येथे पहायला मिळते. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. बेदरकर यांनी दुर्मिळ वनस्पती वृक्ष, प्राणी यांच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या आहेत. मेळघाटातील लेंजा ही अशाच प्रकारची एक दुर्मिळ वनस्पती. लेंजा या झाडाची साल कॉफी, बोर्नव्हिटा तसेच बिस्कीट बनविण्यासाठी वापरल्या जाते. त्यामुळे या वनस्पतीचे संरक्षण अत्यंत आवश्यक झाले आहे. मुरडशेंग, घोडवेल, बेल, कोरांटी, बिजा, नागवेल, खोबरवेल (अनंतमुळ), पारवरी, निरगुडी, जंगली कापूस तसेच चित्रक सारख्या अगदी दुर्मिळ वनस्पती येथे जवळून बघायला मिळाल्या. चित्रक या वनस्पतीच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आदिवासी गरोदर मातांना या पानांचे विविध पदार्थ करुन खायला देतात. वन्यप्राणीही या झाडांची पाने खातात.

    होंबा, कार्वी, पांढरी मुसळी, माऊलवेल, भोरकांदा, जंगली केळी, बचनाग (पेव) ही अत्यंत दुर्मिळ असलेली आणि मेळघाटचे वैभव असलेली वनस्पती अशा दुर्मिळ वनस्पती जंगलातील पाऊलवाटेने पदभ्रमण करतानाच बघायला मिळतात.

    मेळघाटात सुमारे २६५ प्रकारचे पक्षी आहेत. यामध्ये सर्पगरुड, मोर, घार, रानपिंगळा आणि पक्षांना खाद्य म्हणून रान कोंबडी विविध प्रकारचे साप आदींनी समृध्द असलेले हे जंगल जगाच्या इतर जंगलाच्या तुलनेत समृध्द असल्याची ग्वाही वन्यजीव संरक्षक किशोर रिठे यांनी दिली.

    वनांचे संरक्षण करताना वनकर्मचाऱ्यांवर पडणारा ताण आणि प्रतिकूल परिस्थितीतही वनकर्मचारी विविध वन्यजीवांचे व जंगलाचेही संरक्षण समर्थपणे करतात याची माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या जंगल सफारीचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यवनसंरक्षक डॉ. अनिल मोहन म्हणाले की, राज्यातील समृध्द वनसंपदा संरक्षणाची जबाबदारी सर्वांचीच आहे. वनसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढावा ही अपेक्षा असतानाच मेळघाट हा परिसर जंगलांना आगी लागण्यासाठी प्रसिध्द होता. वनविभागाच्या सामुहिक प्रयत्नामुळे मागील दोन वर्षापासून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त झाल्याचेही यावेळी आवर्जून सांगीतले.

    गुगामल वन्यजीव क्षेत्रातील बोरखेडी अंतर्गत चार वनखंड असून सुमारे ७ हजार ८८५ हेक्टरवर हे जंगल मोठ्या डौलाने उभे आहे. या वनपरिक्षेत्रात वाघ, हरिण, गवा, सांबर, रानडुक्कर त्यासोबत सायाळ आदी प्रजातींचे वास्तव्य आहे. वन्यजीवांसाठी सात नैसर्गिक पाणवठे असून यामध्ये बंदरकहू, आमराई, कोहूपाणी, सांबरपाणी, वारुडा, जिंगोतडा, हलदूपाणी यांचा समावेश आहे. यामध्ये साधारणत: मे पर्यंत वन्यप्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध राहील. या संपूर्ण वनक्षेत्राचे संरक्षण एक वनरक्षक करतो. तो सतत तीन दिवस वनक्षेत्रातच राहतो आणि त्यांच्या मदतीला याच भागातील आदिवासी वनमजूर जंगलाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात.

    मेळघाटचे समृध्द जंगलाचे समवर्धन आणि संरक्षण हे वनविभागाचे प्राथमिकता असली तरी निसर्गप्रेमींनीही आपला सहभाग दिल्यास समृध्द वनसंपदेसोबत जैवविविधता व वन्यप्राण्यांच्या सरंक्षणासाठी आपला सहभाग असल्याचा निश्चितच आनंद मिळेल. सोळा किलोमीटरच्या वनभ्रमणाचा आनंद सुमारे पाच तासात घेऊन कोलखासच्या वनविश्रामगृहाकडे परतीचा प्रवास सुरु झाला.

  • अनिल गडेकर 
  • गाव करील ते राव करील काय..?

    गावातील युवकांनी गावच्या विकासात लक्ष घातले तर मोठया प्रमाणावर चित्र बदलू शकते गावच्या शिक्षित युवकांनी या कामात पुढाकार घेतला तर गावाचा कायापालट व्हायला निश्चितपणाने वेळ लागत नाही याचे प्रत्यंतर वर्धा जिल्ह्यात दोन गावांमध्ये आठ दिवसातच यायला लागले आहे.

    केंद्राच्या ग्रामविकास विभागातर्फे भारत निर्माण अभियान हे अभिनव अशा प्रकारचे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण जनतेच्या वेगवेगळया समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने शासकीय योजनांची माहिती मिळणे त्यासाठी अर्ज आणि इतर बाबींची पूर्तता करणे यामध्ये मार्गदर्शन करणारे खूप कमी असतात परिणामी ग्रामजीवनाचा स्तर उंचावण्यासाठी केंद्राने दिलेला निधी खर्च होत नाही आणि ग्रामीण जनतेला त्या योजनांचा लाभ देखील मिळत नाही.

    आजही 65 टक्के भारत ग्रामीण भागात आहे मधल्या काळात नागरिकरणाचा रेटा वाढला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संदेश दिला होता ' खेडयाकडे चला ' मात्र प्रत्यक्षात उलटा प्रवास होताना दिसतो. ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी लाखो कोटींचा निधी विविध योजनांच्या माध्यमातून राखीव ठेवला आहे. यात रोजगार हमी, पेयजल, तसेच आरोग्य योजनांसारख्या मोठया योजना आहेत मात्र ज्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून भारत निर्माण चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

    विशिष्ट गावाची निवड करुन त्या गावातील होतकरु दहा-पंधरा युवकांचा समूह निवडायचा या युवकांना प्रशिक्षित करायचे हे युवक नंतर गावात ग्रामसभेत सहभागी होण्यापासून विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती देणे, योजनांबाबत सल्ला देणे तसेच अर्ज भरुन देणे आदी कामे मानधन न घेता करतात. महाराष्ट्रात यासाठी सांगली आणि वर्धा जिल्ह्याची निवड झालेली आहे.

    वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्या मध्ये असलेला ईसापूर आणि रत्नपूर या दोन गावांमध्ये ' भारत निर्माण अभियान ' गांधी जयंती पासून सुरु झाले. यात प्रशिक्षित युवकांच्या गटाने प्रथम ग्रामसभेत सहभाग घेतला त्या दिवसापासून या युवकांनी स्वयंसेवक होवून हाती झाडू घेऊन स्वच्छता सुरु केली.

    प्रारंभी गावात कुतूहल होते मात्र आठवडाभरात सारा गाव स्वच्छतेच्या कामी पुढे आलाय त्यांनी गाव स्वच्छ केला. उघडयावर शौचाला बसू नये असा संदेश गावात पोहचला. अशा जागा स्वच्छ करुन त्या जागांवर आता रांगोळया घालण्यात आल्या आहेत.

    म्हणतात ना गाव करील ते राव करील काय ? आणि खरोखरच ही म्हण सिध्द करत ईसापूर आणि रत्नपूर मध्ये भारत निर्माणचा पहिला धडा गिरवला जातोय.

    Monday, October 24, 2011

    निसर्ग सहवास

    पक्ष्यांसारखं झाडावर आपलं घरटं असलं तर...लाकडापासून बनविलेल्या सर्व सुखसोईंनी युक्त घरात निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळालं तर...लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत बेचक्याने उंबरं पाडणे किंवा झाडावर शिडी लावून नारळ पाडण्याची संधी मिळाली तर... हिरव्यागार वातावरणात झाडाझुडपातून विविधरंगी फुलांचे सौंदर्य न्याहाळतांना निवांतपणे अशाच वातावरणात सुटीचा आनंद उपभोगण्याची संधी कृषि पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात उपलब्ध झाली आहे. दापोली शहरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या गव्हे गावातील महिला शैलजा अमृते आणि त्यांच्या कुटुंबियांनी चालविलेल्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या निवास -न्याहरी केंद्रात गेल्यावर निसर्गाचा खरा आनंद घेता येतो.

    दापोली शहराला लागून असलेल्या जालगावमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या देवळापासून उजव्या बाजूला गव्हे गावाला जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. रस्ता दाट झाडीतून जातो. या रस्त्याने जातानाही कोकणातील पारंपरिक वृक्षांसह अनेक रानफुलांचे सौंदर्य पहायला मिळते. गावात शिरताना 'अमृते' नाव विचारल्यावर 'वर टेकडीच्या टोकाला' एवढं ठरलेलं उत्तर मिळतं. रस्त्याने दिसणारा 'निसर्ग सहवास ' नावाचा फलक पाहिल्यावर दाट झाडीतील एखादे हॉटेल असावे असाच अंदाज येतो. प्रत्यक्षात याठिकाणी पोहोचल्यावर फळझाडांची कलमं उपलब्ध करून देणारी बाग असावी असंच वाटलं. वरच्या बाजूस घराला लागून टेबल-खुर्च्या असल्याने चहा-नास्त्याची सोय आणि झाडातून भटकंती एवढंच काय ते असावं असं वाटलं. मात्र अरविंद अमृते यांच्याशी गप्पा सुरू झाल्या आणि त्या ऐश्वर्यामागचे परिश्रम आणि जागेचे खरे सौंदर्य क्रमाने समोर येऊ लागले...

    ...मुंबई येथे विकास अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अरविंद अमृते यांची आर्थिक स्थिती तशी चांगलीच. पत्नी शैलजा अमृते यादेखील नोकरी करीत. मात्र गावातील माती, माणूस आणि पाणी यासाठी प्रत्येकाने काहीतरी करावं या तत्वज्ञानावर निष्ठा असलेल्या अमृते यांनी नोकरी सोडून कोकणचा रस्ता धरला. त्यांनी अर्ध्या एकर जागेवर फळझाडांची लागवड केली. फळबाग फुलविताना निसर्गाचं अवलोकन आणि त्यातूनच नवे प्रयोग सुरू झाले. श्री.अ.दाभोळकर यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे द्राक्षाच्या डॉग्रीजचा साठा करून त्याचे कलम करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला.

    'जे जे आपणासी ठावे...' या तत्वानुसार आपल्या परिसरातील तरुणांना कलमाचे शास्त्र शिकविण्यासाठी गव्हे येथे त्यांनी २०० ते २५० तरुणांच्या बॅचला प्रशिक्षण देण्याचे सुरू केले. आतापर्यंत ४००० पेक्षा जास्त तरुणांनी ही कला शिकून नाशिक परिसरात रोजगार मिळविल्याचे अमृते अभिमानाने सांगतात. एकीकडे प्रशिक्षण सुरू असताना दुसरीकडे फळबागेचे क्षेत्रफळ आणि फळप्रक्रीया उद्योग विस्तारत होता. फळबागेतील यशस्वी प्रयोगांमुळे त्यांना उद्यान पंडीत तर शैलजा अमृते यांना जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    आज २० एकराच्या बागेत आंबा, काजू, फणस, चिकू, कोकम, नारळ अशी अनेक झाडे आढळतात. फळबागेसोबत असलेल्या नर्सरीत १८० प्रकारची फुलझाडे आहेत. केवळ गुलाबाचे ८३ प्रकार आहेत. गुलाब कोकणात प्रथम आणल्याचे अमृते अभिमानाने सांगतात. फळापासून अनेक प्रकारचे ज्यूस, जॅम आणि इतर पदार्थ तयार करून पर्यटकांना इथे उपलब्ध करून दिले जातात. २५ वर्ष ही फळप्रक्रियेची यशस्वी परंपरा सुरू आहे. परिसरातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून शैलजा अमृते यांनी बचत गटाचा संघ तयार केला आहे. या संघाच्या माध्यमातून ५० बचत गट उभे राहिले असून या महिलांना कोकणातील पारंपरिक उत्पादनावर प्रक्रीया करून उत्पादने विकण्याचे प्रशिक्षण त्या स्वत: देतात. आम्ही भेट दिली तेव्हा नुकत्याच नाचणीपासून कुरकुरे बनविण्याच्या यंत्राची माहिती कृषि विद्यापीठातून घेऊन त्या परतल्या होत्या. 'आपल्या गरजा कमी ठेवायच्या आणि जे आपल्यापाशी आहे ते इतरांना द्यायचं' हेच यशाचं रहस्य असल्याचं या दाम्पत्याने सांगितले. यांचा मुलगा आशिष याने वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कृषि पर्यटनाच्या क्षेत्रात अल्पावधीतच यश मिळविले आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे मुंबईत शिक्षण घेतल्यावर वडिलांनी प्रयत्नाने उभारलेल्या 'हिरव्या' ऐश्वर्यात आणखी भर घालण्याचा निश्चय करून कृषि पर्यटनाकडे वळण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याच्याच प्रयत्नांना येणाऱ्या पर्यटकांसमोर अभिमानाने ठेवणारा हा 'निसर्ग सहवास' आहे...

    ...हे पर्यटन केंद्र उंच टेकड्यावर असल्याने परिसराशी निसर्ग शोभा एका नजरेत दिसते. दारातून प्रवेश करताच अनेक फळझाडांची कलमे स्वागतासाठी असतात.खाली आणि वरच्या बाजूला दाटझाडी असल्याने याठिकाणी निवास व्यवस्था असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. समोर अमृते यांचे निवास, खालच्या बाजूस कलमांचे प्रशिक्षण देण्यासाठी लहानशी खोली, घराच्या समारेच्या बाजूस असलेल्या टेंटमध्ये टेबल-खुर्च्या मांडलेल्या, सभोवती अनेक पर्यटकांच्या भेटीची छायाचित्रे लावलेली...मात्र हे ओलांडून पुढे गेल्यावर निसर्गाचा अदभूत 'सहवास' मिळतो.

    अनेक रंगांची फुले, झाडात लटकणारे झोपाळे, लाल मातीची वाट, लाकडी तंबू आणि एका ठिकाणी पिंपळाच्या झाडाकडे नजर गेल्यावर तर आपली पाऊले थबकतातच. झाडाच्या वरच्या टोकाला मोठी झोपडी बांधलेली दिसते. बाजूच्या लाकडी जिन्याने वर गेल्यावर तर सुखद धक्का बसतो. या लाकडी झोपडीत डबलबेडसह हॉटेलच्या रुमप्रमाणे सर्व प्रकाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुळात या झोपडीवजा घराचे चारही कोपरे ज्या कल्पकतेने पिंपळाच्या फांद्यांवर फिट केले आहे ते पाहता येणारा प्रत्येक पर्यटक या कल्पकतेला सलाम करतो. या 'ट्री हाऊस'च्या खिडकीचा पडदा बाजूला सारताच समोरच्या अद्भूत निसर्गाच्या दर्शनाने पाऊले तिथेच रेंगाळतात. समोर असते हिरव्यागार डोंगरांची रांग आणि सभोवती असणारी दाट झाडी. अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणाहून आपल्याला पहायला मिळतात.

    सायंकाळची वेळ आणि त्यातच दापोलीला आणखी एक भेट असल्याने मनात असूनही चटकन खाली उतरावे लागले. थोडं पुढे गेल्यावर त्याचप्रकारचा सुखद धक्का देणारे 'लॉग हाऊस' आहे. हेदेखील लाकडापासून बनविलेले आहे. फयान वादळात पडलेल्या झाडाच्या लाकडापासून ते बनविल्याचे आशिषने सांगितले. विशेष म्हणजे या लाकडी खोलीला टाईल्स बसविल्या आहेत आणि बाथरूममध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या दोन्ही हाऊसच्या मधोमध असलेल्या तंबूत मोकळ्या हवेत चहा किंवा जेवण घेता येते. इथल्या कॉटेजेस मध्ये वारली पेंटींग्ज'चा उपयोगही नाजूकपणे करण्यात आल्याने आतही प्रसन्न वाटते.

    या पर्यटन केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. याठिकाणी फळप्रक्रिया करताना किंवा कलम करण्याच्या प्रक्रियेत स्वत: काही वेळ सहभागी होता येते. मुलांना शिडीद्वारे झाडावरून नारळ तोडून त्यातील पाणी पिण्याची वेगळीच मज्जा मिळते. पारंपारिक खेळ, पाण्यात डुंबण्याची मजा, दाट झाडीतील विविधरंगी पक्ष्यांच्या सहवासात मनसोक्त भटकंती आणि सोबत अस्सल कोकणी पदार्थाची चव चाखण्यासाठी हे निवास न्याहरी केंद्र पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले आहे. अमृते कुटुंबियांचे ३२ वर्षाचे श्रम या कृषि पर्यटन केंद्रामागे आहे. त्यासोबतच या कुटुंबियांचा मृदु स्वभाव आणि आतिथ्यशिलता पर्यटकांना मनापासून भावणारी आहे. म्हणूनच काही सेलेब्रिटीजनीदेखील या ठिकाणाला भेट दिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मोबाईलच्या जगातही सुंदर पत्र लिहिले आहे. कोकणातील सौंदर्य पर्यटकांना असेच भुरळ पाडणारे आहे. इथल्या निसर्गाचे महत्व नव्या पिढीला उमगू लागले आहे. त्यामुळेच निसर्गाचे रक्षण करतानाच त्यामाध्यमातून रोजगारासाठी कृषि पर्यटनासारख्या पर्यायाकडे तरुणवर्ग आकर्षित होत आहे. कोकणच्या विकासासाठी ही आश्वासक बाब म्हणावी लागेल. त्यातच आशिषसारख्या तरुणांचा आदर्श असला की परिसरात अशी पर्यटन केंद्र निश्चितच विकसित होतील. अर्थात त्यासाठी अरविंद आणि शैलजा यांच्यासारख्या थोरल्यांच्या कष्टाची पार्श्वभूमी आणि आशिर्वाद असले तर आणखी उत्तम.

  • डॉ.किरण मोघे 
  • चला करुया आपण सर्वजण मिळून दिवाळीचा एक संकल्प....थांबुया स्रीभूण हत्या.....!

    वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आज स्त्रियांची संख्या कमी कमी होत आहे. वंशाला दिवा हवा किंवा उतार वयात आधाराला मुलगाच हवा ! अशा खुळचट कल्पनेतून स्त्रियांचा तिरस्कार करणे उचित ठरणार नाही. माहेर व सासर अशा दोन्ही कुळांचे नाव लौकीक करणारी स्त्री आहे. अशा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी लोकचळवळ आजच्या युवक-युवतींनी पुढाकार घेऊन समाजातील अनिष्ठ प्रथा मोडीत काढल्यानंतरच तुमच्या-आमच्या लेकी वाचतील. मुलींचा योग्य सन्मान करुन मुला-मुलीमधील असमतोल थांबविण्याची माहिती या लेखातून ..

    आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या शोधात नव नवे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहेत. मानवाचे उत्पादित केलेले तंत्रज्ञान मानवाच्या विकासासाठीच आहे की नाशासाठी आहे? याचा अर्थबोध मानवी समाजात रुजला नसावा. आपला स्वार्थ साधण्यासाठीच त्याचा वापर केला असावा, असे दिसून येते. समाज व्यवस्थेतील पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुष श्रेष्ठ. तर महिला दुय्यम असा समज आणि त्यात हुंडा पध्दती अशा आर्थिक अडचणीत सापडलेली कुटुंबसंस्था यामुळे स्त्रीला आजही कुटूंबात व समाजात दुय्यम वागणूक दिली जाते.

    “जगा आणि जगू द्या” हा मानवतावादी धम्म विचार गौतम बुध्दानी सर्वप्रथम मानवासमोर ठेवला. धम्माचा प्रचार प्रसारात धम्म उपासक-उपासिका यांना समतेच्या विचार प्रवाहात आणले. यात दुमत नाही. अशा विचारातूनच स्त्री-पुरुषांना आजच्या लोकशाहीत समतेचा अधिकार मिळाला आहे. कायद्याद्वारे स्त्रीला संरक्षण व सवलती देऊन त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा मान-सन्मान आजही मिळत आहे, असे असताना सुध्दा नव्या तंत्रज्ञानामुळे समाजातील खूळ कल्पनेचा बाऊ करुन कुटुंबात मुलगा हाच वंशाचा श्रेष्ठ दिवा असा दृढ समज समाजात असल्याने विकसित झालेले नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्त्रीभ्रूण हत्येला कारणीभूत ठरत आहे.

    सामाजिक जाणीवेचा अभाव, सामाजिक बांधिलकीला बट्टा लावून पैसे मिळविण्याचा हव्यास यामुळेच स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. वाढत्या लोकसंख्येत स्त्रियांच्या प्रमाणात घट होत असल्याने मानवी समाजाला एक कलंक आहे. स्त्रीभ्रूण हत्यामुळे मुलाच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी होत आहे. याला वेळीच आळा घालणे अत्यंत गरजेचे होऊन बसलेले आहे.

    पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा श्रेष्ठ, वंशाचा दिवा, कुटुंबाचा वारस अशा ह्या रुढ कल्पकतेला बळी न पडता आजच्या तरुण तरुणीची लोकचळवळ म्हणून स्त्रीभ्रूण हत्येला विरोध दर्शवून स्त्रीभ्रूण हत्या करणारी केंद्र बंद केली पाहिजेत. नवतरुण यांनीच पुढे येऊन स्त्री जीवनाचे महत्व समाजाला पटवून देणे अनिवार्य आहे. त्यातूनच समाजाची वंशाचा दिवा मुलगा ही मानसिकता बदलायला हवी.

    प्रत्येक कुटुंबातील मुलगी शिकली तर येणाऱ्या भविष्यात दोन कुटुंबाचे नाव उज्वल करेलच. या शिवाय एक स्त्री समाज व्यवस्थेत लोखंडी साखळी सारखी घट्ट व मजबूत अशी अनेक नाती निर्माण करते. कोणाची तरी सर्वप्रथम मुलगी , नंतर सून, पत्नी, आई, चुलती, मावशी, आत्या, बहीण, आजी असे एक व्यक्ती अनेक नाते निर्मितीबरोबरच कुटुंब संस्था, समाज व्यवस्था एका स्त्रीमुळे निर्माण होते.

    मुलाच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूण हत्या करणे हे फारच मोठे पाप आहे. कसली संस्कृती, कसले खूळचट विचार या स्त्रीभ्रूण हत्यामुळे येणाऱ्या पिढीला “आई/माता” कशा मिळणार हा एक मोठा प्रश्न राक्षसी आक्राळविक्राळ रुप धारण करुन पुढे येणारा प्रश्न आहे. हे थांबविण्यासाठी तरुण – तरुणीनी लोकचळवळीतून समाजातील अनिष्ठ प्रथा मोडीत काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यातूनच सोनोग्राफी केंद्राचे खरे रुप लक्षात येईल आणि आपोआप बंदही पडतील. हे एक सामाजिक परिवर्तनाचे महान कार्य आहे. आजची लेक उद्याची आदर्श आई समाज परिवर्तनातून पुढे येणारी स्त्री शक्ती आहे.

    हिंदू धर्मात सीता, लक्ष्मी, पार्वती , रुक्मिणी, दुर्गामाता, जगदंबा, सरस्वती, सत्यभामा आदी स्त्री रुपे धारण करणाऱ्या देवतेच्या समोर स्त्री-पुरषवर्ग नतमस्तक होत असल्याचे दैनंदिन चित्र पहातोच. परंतु समाजव्यवस्थेत स्त्रीभ्रूण हत्या करणे समाजात मोठा कलंकच आहे. या मागची कारणमिमांसा शोधून नव तरुणांनी लोक चळवळीच्या माध्यमातून मानसिकता बदलली पाहिजे. ही लोकचळवळ घराघरातून सुरु होऊन तिचा विस्तार मुलगी वाचवा या समग्र क्रांतीत आला पाहिजे.

    महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा वारसा महाराष्ट्राला लागला आहे. अनिष्ठ प्रथा झुगारणारे, स्त्री चळवळीला प्राधान्य देणारे राज्य म्हणून ओळखले जाते. पुरुष प्रधान कुटूंब व्यवस्थेत हुंडा, लग्न कार्य यासाठी लागणारा खर्च आणि वाढती महागाई अशा मानसिकतेमुळे गर्भलिंग चिकित्सा करण्याचे प्रकार वाढतच आहे.

    मुलगाच हवा वंशाला दिवा हवा एवढच कारण नाही तर समाजातील खूळ विचारात दडलेली कुटुंबसंस्था बदलली पाहिजे. लेक वाचविण्यासाठी ग्रामीण शहरी भागातील प्रत्येकांच्या घरा-घरातून लोकसहभागातून मोठी चळवळ उभी रहायला हवी. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आदींचे सक्रिय योगदान लाभणे आवश्यक आहे. आता समाजातील सर्वांनीच चिंतन आणि आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. केवळ कायदे करुन कुठलीही गोष्ट शक्य नाही तर कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी समाजाचा पाठींबा मिळावा लागतो. एखाद्या गोष्टीचे महत्व लोकांना पटविणे त्यांच्या गळी उतरवणे हेही महत्वाचे आहे. स्त्रियांनीही आता स्त्री ही समाज-संस्कृतीची जननी आहे याचे भान ठेऊन स्त्रित्व जगविले पाहिजे.

  • प्रकाश डोईफोडे
  • दिवाळीचा गोडवा

    देशात महिला सक्षमीकरण चळवळीने वेग घेतला आहे. पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यश मिळवितानाच आपल्या पारंपरिक पाककलेच्या माध्यमातूनही महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. रत्नागिरी शहरातील सुरुची महिला उद्योग यापैकीच एक आहे. सुशिलाबाई दाते यांच्या महिला मंडळाकडून प्रेरणा घेत त्यांच्या कार्यकुशलतेला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याच नावाचे आद्याक्षर 'सु' आणि त्यांची पाककलेतील 'रुची' असे मिळून 'सुरुची' हे नाव संस्थेला देण्यात आले आहे.

    उद्योगाच्या संस्थापिका सरोज गोगटे यांनी प्रारंभी तीन महिलांच्या मदतीने उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर आणखी चार महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. पुरणपोळी, चकली, कडबोळे आदी वस्तू तयार करून त्या शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन आणि घरोघरी जाऊन विकले जात असे. मात्र मालाला उचल कमी असल्याने तेवढेसे यश आले नाही. अशा परिस्थितही स्मिता गावडे, विद्या पटवर्धन, गीता जोशी आदींच्या सहकार्याने उद्योगाला पुढे नेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरुच राहिले.

    महिलांनी एकत्रितपणे जोड व्यवसाय म्हणून १९९२ मध्ये जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनसाठी निविदा भरली. ती स्विकारण्यात आल्याने कँन्टीनचा व्यवसाय सुरू झाला. उत्पन्नाची शाश्वती झाल्याने उद्योगाला थोडा आधार मिळाला. मात्र पाच वर्षानंतर महिलांनी फारसा लाभ नसल्याने कँन्टीन चालविणे बंद करून घरगुती गरजांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रीत केले. मात्र कँन्टीन बंद झाल्याने उद्योगाच्या मालकीचे साहित्य ठेवण्याची समस्या महिलांसमोर उभी राहिली. काही दिवस सदस्यांच्या घरी साहित्य ठेवण्यात आले. महिलांची धडपड पाहून आजगावकरवाडीतील प्रेमजी आरस ट्रस्टने उद्योगासाठी आपल्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या महिलांनी मागे वळून पाहिलेच नाही.

    कामकाजातील व्यस्ततेमुळे महिलांना घरातील कामासाठी वेळ कमी मिळत असल्याने 'फास्ट आणि रेडीमेड फूड' ला मोठी मागणी असते. विशेषत: सणाच्यावेळी ही मागणी आणखी वाढते. हेच डोळ्यासमोर ठेऊन 'सुरुची'च्या माध्यमातून या महिलांनी मागणीप्रमाणे फराळ करून देण्यास सुरुवात केली. काही दिवसातच हा प्रयोग यशस्वी ठरला. पदार्थांचा दर्जा आणि चव चांगली असल्याने मागणी वाढू लागली. घरोघरी जाऊन पदार्थ विक्री बंद झाली. उलटपक्षी ग्राहकच आजगावकरवाडीत येऊन ऑर्डर नोंदवू लागले.

    पदार्थ तयार करताना गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करण्याचे धोरण स्विकारतानाच उद्योगातील महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योगाच्या ठिकाणीच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आज १० ते १५ महिलांना या उद्योगात रोजगार मिळाला आहे. वस्तूंची खरेदी, हिशेब ठेवणे, विक्री, ऑर्डर स्विकारणे अशी कामे महिलांना वाटून देण्यात आली आहेत. हिशेब चोख असल्याने लेखापरिक्षणात या महिला उद्योगाला 'ब' वर्ग देण्यात आला आहे.

    दिवाळीच्या फराळाची तयारी २० दिवस पूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. घरातील कामे सांभाळून सोईप्रमाणे संस्थेच्या सदस्या कामासाठी वेळ देतात. दिवाळीच्या काळात चिवडा, शंकरपाळे, चकली, करंज्या,अनारसे, लाडू आदी पदार्थांना चांगली मागणी असल्याचे अध्यक्षा विद्याताईंनी सांगितले. एरवी पुरणपोळी, उकडीचे मोदक, कडबोळी आणि चकल्या मागणीप्रमाणे तयार करून देण्यात येतात. पदार्थंाच्या विक्रीतून होणाऱ्या लाभातून महिलांच्या नावे पोस्टात रक्कम ठेवली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रमही त्यातून आयोजित करण्यात येतात. महिलांना रोजगार देताना सामाजिकतेचा जपलेला पैलू या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

    वयाची साधारण साठी ओलांडलेल्या महिला सामाजिक भावनेतून एकत्रितपणे काम करताना बघून इतर महिलांचा उत्साहदेखील वाढतो. कामाच्या ठिकाणी असणारी तन्मयता आणि उत्साह बरेच काही सांगून जातो. इतरांची दिवाळी गोड करण्यासाठी परस्परातील गोडवा जपत या महिलांनी पुढे नेलेला हा उद्योग इतरही महिलांना प्रेरक आहे. त्यांनी तयार केलेल्या लाडूचा गोडवा कदाचीत कमी-जास्त असू शकेल किंवा चकलीतला कुरकुरीतपणा कमी होईल मात्र त्या उद्योगासाठीचे प्रयत्न आणि त्यामागची भावना लक्षात घेतल्यास हे पदार्थ आणखी चविष्ट लागतील. इतरांसोबत आपलीही दिवाळी गोड करावी ती अशी...!

    Friday, October 21, 2011

    वाघाचे प्रोफाईल

    मेळघाट सारख्या विस्तीर्ण संरक्षित जंगलामध्ये वन्य प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना दुर्लभच असते. परंतु निसर्गाची आवड असलेल्या पर्यटकांना वाघासह इतर प्राण्यांच्या अस्तित्वाच्या पुराव्यांच्या नोंदी ठेवून मेळघाटमध्ये सुध्दा वाघ आहे याच्या पाऊलखुणा अत्यंत मेहनतीने संकलित केल्या आणि निसर्गप्रेमींसमोर ठेवल्या तर मेळघाटमध्ये वाघ पाहिल्याचा अनुभव निश्चितच मिळू शकतो.

    चिखलदऱ्यापासून सेमाडोहकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या आमडोहपासून बंदरकहूकडे जाणारी निसर्ग पाऊलवाट प्रत्येक पर्यटकांना मेळघाटातील समृध्द जैवविविधतेचं दर्शन घडविणारे आहे. आणि त्यासोबतच वाघासह वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणाही बघताना वाघ पाहिल्याचा आनंद देणाऱ्या आहेत.

    वनविभागाचे काम केवळ जंगलाचे संवर्धन करण्याबरोबर या क्षेत्रात असलेल्या जैवविविधतेसह वन्य प्राण्यांच्या प्रत्येक पाऊलखुणावर देखरेख ठेवण्याचेही आहे. अशाच एका बोरखेडी बिटमध्ये वनरक्षक या पदावर कार्यरत असलेल्या राजेश घागरे या युवकाने चक्क वाघाचेच प्रोफाईल तयार केले आहे. संरक्षित वनक्षेत्रात काम करत असताना केवळ शासकीय नोकरी म्हणूनच दिलेली जबाबदारी सांभाळत असतांना वन्य प्राण्यांच्या संवर्धन व संशोधनाची आवड असलेल्या राजेश घागरे यांनी बोरखेडी नियत क्षेत्रामध्ये एक वाघ असल्याचे पुरावे शोधले. या पुराव्यांचा मागोवा घेत वाघाचाही शोध घेतला नव्हे तर येथे बसविलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये. नोंद झालेल्या वाघाचे संपूर्ण निरीक्षण केले आणि या वाघाचे दैनंदिन प्रोफाईलच तयार केले.

    बोरखेडी संरक्षित क्षेत्रात सांबर पाणी हा पाणवठा आहे. उन्हाळ्यातही या पाणवठ्यावर पाणी असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या क्षेत्रात वाघाचीही नोंद झाली आहे. या वाघिणीच्या पायाच्या पंजावरील अनामिका हे बोट थोडे कापले असल्यामुळे या वाघिणीला अनामिका हेच नाव दिले. या अनामिका वाघिणीचा ओळख क्रमांक आयडी सीसीबी -०१ असा ठेवण्यात आला आहे. अनामिका बोरखेडी क्षेत्रात कुठे वास्तव्याला राहते इथपासून तिची दिनचर्याही टिपण्याचे काम या प्रोफाईलमध्ये अद्ययावतपणे ठेवण्यात आले आहे. नुकताच एक वाघही या क्षेत्रात आढळल्याची नोंद झाली असून अनामिकेला सोबती मिळाला आहे. वाघाच्या पाऊलखुणा तिचा आवाज, तिची विष्ठा, तिचे खाद्य आदी हालचालीवरही नियंत्रण ठेवून तशा नोंदी या रजिस्टरमध्ये घेण्यात आल्या आहेत. पर्यटकांना अनामिकेचे प्रोफाईल म्हणजे प्रत्यक्ष दर्शनाचाच अनुभव देऊन जाते.

    राजेश घागारे वनरक्षक हे तीन वर्षापासून बोरखेडी या क्षेत्रात कार्यरत आहेत. एम.ए. इंग्रजी करुन ते वनरक्षक म्हणून नियुक्त झाले. मेळघाटच्या विविध भागात काम केल्यानंतर वन्यप्राण्यांच्या अभ्यासाकडे ते वळले. राजेश घागरे यांनी तेरा वेळा प्रत्यक्ष वाघ बघितला आहे. मेळघाट हे वन्यप्राण्यांसाठी अत्यंत संरक्षित क्षेत्र असल्याचा असा त्यांचा विश्वास आहे. वनांचे संरक्षण व संवर्धन करण्याची त्यांची विशेष आवड असल्यामुळे जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही ते जंगलावर प्रेम करण्याचं शिकवतात. याच जंगलातील नाल्याजवळ असलेल्या आंब्याचा विशाल वृक्ष आहे. वाघ नेहमी या झाडावर नखे साफ करण्यासाठी येतो. एकच पाऊलवाट असल्यामुळे वाघाचे दर्शनही शक्य होऊ शकते. गवा, सांबर, डुक्कर आदी वन्य प्राणीही याच पाऊलवाटेने विशाल जंगलाकडे जातात.

    बोरखेडी परिसरात वन्यप्राण्यांसोबतच समृध्द वनसंपदाही आहे. येथे सागवान, कुसुम, टेंभुरणी, हलदु, धावडा, डुबा, तिवस, मोईल आदी प्राणी आहेत. तसेच गवत व झुडप मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. जैवविविधतेचें दर्शन घेतानाच एकाच झाडावर कातीनने विणलेले घरटेही पहायला मिळते.

    वनपर्यटनाचा आनंद घेताना केवळ मेळघाटचे दर्शन वाहनातूनच होत नाही तर अंबापाटी ते बंदरकहू यासारख्या वनवाटानेही होऊ शकते. पण यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर चालण्याची तयारी असावी लागते. वनाचे संवर्धन व संरक्षण ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आणि ती सामुहिकपणे स्वीकारली तर समृध्द वनसंपदेची ओळख निश्चितच करुन घेण्यास मदत होऊ शकते.

  • अनिल गडेकर 
  • सामुहिक प्रयत्नांनी फुललेले नवेगाव साधू

    नागपूर जिल्हयातील उमरेडपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर नवेगाव आहे. या गावाची लोकसंख्या २८८१ असून गावाची विशेषत: अशी की या गावातले सर्व ग्रामस्थ हे गावविकासाच्या दृष्टीने पछाडलेले आहेत. या गावातील ग्रामस्थांचा असा मानस आहे की, आणखी थोडया कालावधीनंतर नवेगाव साधू हे गाव भारतातील अव्वल क्रमांकाचं आदर्श गाव म्हणून झळकेल व त्यासाठी कष्ट करण्याची प्रवृत्ती या गावात निदर्शनास येते. यासाठी त्यांनी प्रथमत: स्वच्छता विषयक सर्व घटकाच्या अनुषंगाने पावलं उचललेली आहे.

    या गावातल्या कोणत्याही रस्त्यावरुन फेरफटका मारला असता असे दिसून येते की ,स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण अशी कामे त्यांनी केलेली आहे. या गावात कुठेही उघडी गटारे वाहात नाहीत, सांडपाण्यासाठी सर्वांना नाल्या बांधून दिल्या आहेत. गाव हागणदारीमुक्त केले आहे, त्यामुळे दुर्गंधीचा लवलेशही नाही, दुर्गंधीच नसल्याने मच्छरांनाही स्थान नाही. प्रत्येकाकडे शुध्द पिण्याचे पाणी जाईल, याची व्यवस्था केली आहे. आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली गेली असल्याने दोन वषांर्पासून गावात कोणतीही साथ फिरकली नाही. लोक डॉक्टारांचा पत्ता देखील विसरले आहेत.

    गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी या ग्रामपंचायतीला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. सर्वप्रथम प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधकाम करण्यासाठी बाध्य केले. गावात जाता-येता शौचालय बांधकामाची विचारणा केली तसेच शौचालय बांधण्याच्या विषयावर अनेक बैठका घेतल्या गेल्या. यात महिलांच्या वेगळ्या सभा आयोजित करण्यात आल्या या सभामधून संडास नसल्याचे अपाय समजावून सांगितले व शौचालयशिवाय महिलांची होणारी अडचण यावर विशेष भर देण्यात आला. रस्त्यावर लोटा घेऊन कोणी बसू नये म्हणून पाळत ठेवण्यात आली. बाई असो की बापडा, लोटा घेऊन दिसला की, त्याला फूल देऊन गांधीगिरीचा मार्ग ग्रामस्थांनी अवलंबला. अनेक प्रसंगी बायांच्या शिव्याही ग्रामस्थांनी खाल्ल्या, पण तरीसुद्धा हार न मानता स्वच्छतेचा ध्यास त्यांनी सोडला नाही.

    सततचे कार्यक्रम व मार्गदर्शन, गावफेरी शौचालय नसलेल्या घरांना भेट, गवंडी प्रशिक्षण, गावस्वच्छता कार्यक्रम विद्यार्थ्यांची प्रभातफेरी इ. उपक्रम गावातील युवक मंडळ व महिला बचत गटाव्दारे राबविण्यात आले. याचा परिणाम प्रत्येक घरी शौचालय बांधकाम पूर्ण झालेत, व त्याचा वापर होऊ लागला. काही ग्रामस्थ ग्रामपंचायतीनं बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांचा सुदधा वापर करु लागले त्यामुळे आपोआपच उघडयावरील शौचविधी करण्याची प्रक्रिया समूळ नष्ट झाली आणि गाव निर्मळ झालं. पूर्वी गावासभोवतालच्या जागेत गावकरी शौचास जात. ती जागा गावक-यांनी श्रमदानाच्या माध्यमातून बगीचा व नैसर्गिक सभागृह तयार करुन सुशोभित केली आहे. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावाचा कचरा टाकण्यासाठी सिमेंटच्या कचराकुंडया उभारलेल्या आहेत. यापासून खत तयार करण्यात येते. भूजल पातळी राखण्याच्या उद्‌देशाने सांडपाण्यासाठी शोषखड्डे केले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम तयार करुन विहिरीत ते पाणी सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या सर्व कामगिरीमुळे केंद्र शासनाचा सन २००८-०९ मध्ये सदर गावास निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    ग्रामस्वच्छता अभियानाबरोबरच जलसंवर्धनाचाही प्रकल्प ग्रामस्थांनी हिरिरीनं राबवला. रुफवॉटर हार्विस्टिंगचा प्रयोग गावात सुरु झाला. छतावर पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी गावकरी प्रयत्न करु लागले. आजूबाजूच्या घरांतील छतांचे पाणी विहिरीत साठवलं जाऊ लागलं.

    सांडपाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्‌डयांसोबतच स्वतंत्र सांडपाणी व्यवस्थापन तंत्र अवलंबण्यात आलं. गावपरिसरात शेततळी खणली गेली. गावाची पाण्याची समस्या कायमची संपली शेतशिवारही हिरवीगार होऊ लागली. गांडूळखत निर्मितीचा व कंपोस्ट खत निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प शाळा व ग्रामपंचायतींन राबविला आहे. त्याचा अवलंब गावकरी करु लागले आहे. गोबरगॅस प्रकल्प गावात सुरु झाले आहे. स्वत: निर्मिलेली वीज घराघरात खेळू लागली.

    गावात कुठेही पानठेला नाही, त्यामुळे खर्राशौकीन प्लास्टिक कुठेही टाकत नाहीत. दारुबंदी असल्याने गावात एकही दारुचे दुकान नाही. दारुच पोटात जात नसल्याने तंटामुक्त गावाची संकल्पना एका झटक्यात प्रत्यक्षात उतरली. तंटामुक्त गाव म्हणून गेल्या वर्षी दोन लाख रुपयांचे, तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत जिल्हयातून पहिले आल्याबददल ५ लाख रूपयांचे पारितोषिक शासनाकडून गावाला मिळालेले आहे.

    आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, या गावात पहिली ते सातवीपर्यंत एकच शाळा व अंगणवाडी आहे. मात्र, ही शाळा पाहिल्यानंतर शहरातील कॉन्व्हेंटलाही ती मागे टाकेल, इतकी चांगली उभारलेली आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, छोटी मुलेच वापरु शकतील असे पिटुकले संडास, हिरवळीचे चोहीबाजूने नटलेले बगिचे, ठिकठिकाणी रेखाटलेले सुंदर वाक्प्रचार व म्हणी, संताची शिकवणूक, संस्काराचे संदेश, भिंतीवर चित्ररुपी रेखाटलेले सुंदर वाकप्रचार व म्हणी, प्रत्येक मुलाला शाळेत जावसंच वाटेल अशीच रचना या शाळेची केलेली आहे. छोटीशी प्रयोगशाळाही या शाळेत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे,. या गावाचा गावक-यांनी केलेला विकास खरोखरच कौतुकास्पद असाच आहे.

    मिळूनी सार्‍याजणी...

    एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचतगटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्विकारलेला पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील परटवणे येथील पार्वती महिला बचतगटाच्या सदस्यांची कामगिरी अशाच प्रकारचे महिलांचे यश अधोरेखित करणारी आहे.

    या बचत गटाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला फक्त ५ ते ६ महिलांनी एकत्र येवून गट स्थापन करण्याचे ठरविले. गटाच्या अध्यक्षा राजश्री देसाई यांच्या प्रोत्साहनाने व प्रयत्नाने कॅनरा बँकेकडून ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्यांनतर गटाच्या कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कालांतराने वाडीतील महिलांना गटाचे महत्व कळू लागल्यावर आता या गटातील महिलांची संख्या १० पर्यंत वाढली.

    दररोज ४ ते ५ तास 'मिळूनी सार्‍याजणी' एकत्रितपणे काम करतात. पापड, मसाले यासाठी लागणारे कच्चे सामान बाजारातून घाऊक स्वरुपात खरेदी केले जाते. मसाल्यासाठी लागणारे पदार्थ उत्तमरितीने वाळविणे, साठवणे आणि त्याची प्रक्रिया झाल्यानंतर विक्री अशा सर्व स्वरुपाची कामे या महिलाच करतात. हळूहळू पॅकींगचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. घरगुती स्वरुपात तयार होणार्‍या पापड, फेण्या, कुरडया, कुळीथ पीठ आदी पदार्थांना देखील त्यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयोगात आणले आहे. परिसरातील गावात आणि शहराच्या ठिकाणी या पदार्थांना चांगली मागणी आहे. कुठल्याच प्रकारचा कमीपणा न वाटू देता प्रसंगी घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री केली जाते. म्हणूनच अधिकाधीक ग्राहकांपर्यंत पोहोचण या महिलांना शक्य झाले आहे.

    पावसाळ्यामध्ये पापड, मसाले हा उद्योग करता येत नाही. या कालावधीत रिकामे न राहता अर्थार्जनाची प्रक्रीया सुरुच रहावी यासाठी महिलांनी भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबई येथून एकत्रितपणे भांडय़ांची खरेदी करून ती स्थानिक बाजारात विकली जातात. खरेदी करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा म्हणून रोटेशन पद्धतीने सदस्यांना खरेदीसाठी पाठविले जाते. त्यामुळे सदस्यांना व्यवहार कौशल्याचे चांगले प्रशिक्षण मिळते. गेली सहा वर्षे हा गट अखंडपणे आपले काम करीत असून यामध्ये मिळणार्‍या नफ्यामध्ये गटातील महिला समाधानी आहेत, असे सांगताना श्रीमती देसाई यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बरेच काही सांगून जात होता. बचत गटाच्या कामातून मिळणारं समाधानही त्यात असावं.

    जास्त शिक्षण नसले तरी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या संसारासाठी काहीतरी हातभार लावण्याची धडपड या बचतगटाच्या सदस्यांमध्ये दिसून येते. व्यवसायात मिळणारा नफा-तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी, विक्री, उत्पादन ही सर्व कामे या महिला चोखपणे पार पाडतात. दरमहा १५ तारखेला गटाची बैठक होते. या बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या, जमाखर्चाचे हिशोब याविषयी चर्चा केली जाते. दरवषी न चुकता गटातील सर्व महिला एकत्र येवून सण-समारंभ सादर करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा ‍िटकून आहे.

    बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरूच ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता खर्‍या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या जोरावर प्राप्त केले आहे, हेही तितकेच खरे!

    केल्याने होत आहे रे...

    रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे गाव हे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सह्याद्रीच्या रांगामध्ये अत्यंत कडेकपारीच्या भागात गाव असल्याने या भागात शेती करणे कठीणच. चिपळूणपासून साधारण २० किलोमीटर असलेल्या या गावात अत्यंत रुंद रस्त्याने जावे लागते. गावाला लागूनच लघुपाटबंधारे प्रकल्प असून त्यापलिकडे सातारा जिल्ह्यातील डोंगररांगा सुरू होतात. अशा दुर्गम भागात तानाजी चव्हाण या ३१ वर्षीय युवकाने शेतीचा यशस्वी प्रयोग साकारला आहे.

    तानाजी १० वी पासूनच घरातील पारंपरिक शेतीकडे लक्ष देत होता. घरात वडिलोपार्जित १० हेक्टर शेती आहे. या क्षेत्रात भातशेती होत होती. मात्र त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे कर्जाच्या चिंतेत असलेल्या वडिलांकडे बघितल्यावर ही परिस्थिती बदलावी असे तानाजीच्या मनात सारखे येई. त्याने आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्ट्रीक सुपरवायझर म्हणून १९९६-९७ मध्ये नोकरीदेखील केली. मात्र सुटीत घराकडे येताना शेताशी असलेली नाळ तोडली नाही. शेतीतच आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा निश्चय करून त्याने १९९८ मध्ये चारसूत्री पद्धतीचा वापर केला. भातशेती बहरू लागताच तेवढ्यावर समाधान न मानता त्याने डोंगराळ भागात शेतीसाठी योग्य भूमी तयार केली. त्यासाठी वर्षभर परिश्रम करावे लागले. अशा भागात आधुनिक शेतीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कष्ट करताना गावकऱ्यांसाठी तो चेष्टेचा विषय झाला होता. मात्र तानाजीने माघार घेतली नाही.

    शेतीची चांगली मशागत केल्यावर त्याने प्रथमच २००६ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर केळीची लागवड केली. केळीच्या पिकातून चांगला फायदा झाल्यावर केळीचे क्षेत्र वाढविले. आज केळी पिकाद्वारे वर्षाला २ ते २.५ लाखचे उत्पन्न होत आहे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी यंदा तानाजीने हळदीची लागवडही केली आहे. ८ एकरात केळी आणि २७ गुंठ्यात हळदीचे पीक चांगले बहरले आहे. शेताच्या बांधावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १०० नारळाची रोपे लावली असून त्यांची वाढही चांगली झाली आहे.

    तानाजीने पाण्याची समस्या सोडविण्यासाठी २००८ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे उंचावर डोंगराच्या मधोमध तयार केले. बाजूच्या नदीतून पाणी पंपाने शेततळ्यात सोडून ते ग्रॅव्हीटीद्वारे शेतात पोहचविले जाते. कृषि विभागामार्फत ठिबक सिंचनासाठी प्रती हेक्टर ३० हजार रुपयांचे सहकार्य मिळाल्याने त्याने संपूर्ण डोंगरावर ठिबकचे जाळे विणले आहे. शेतात जी-९ जातीच्या केळीचे घड लागलेले दिसतात. शेतीचे सर्व व्यवस्थापन स्वत: करीत असल्याने चांगला फायदा मिळत असल्याचे तानाजी सांगतो.

    शेतात नवे प्रयोग करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती हा तरुण शेतकरी सातत्याने घेत असतो. गाव अत्यंत दुर्गम भागात असूनही कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा, कुठेही कृषि प्रदर्शन भरले की त्यात सहभाग, चांगल्या शेतकऱ्यांच्या भेटी यामुळे तानाजीला आपल्या शेतात अनुकूल बदल करणे शक्य होत आहे. 'नोकरी पेक्षा शेती बेस्ट' असं सांगणाऱ्या तानाजीला पूर्वी नावं ठेवणारी माणसं आपल्या शेतात काम करायला येतात याचं समाधान आहे.

    शेती कष्टाचं काम आहे, शेतीसाठी सर्व चांगले घटक उपलब्ध पाहिजेत, अशी धारणा असणाऱ्या युवकांपुढे तानाजी चव्हाण यांनी यशस्वी शेती कशी करावी याचा आदर्श ठेवला आहे. आपल्या प्रयत्नातून 'केल्याने होत आहे रे...' हेच त्याने आपल्या युवामित्रांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मातीशी इमानाने नातं जोडलं की ती भरभरून देते हे तानाजीच्या शेताकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

  • डॉ. किरण मोघे
  • Thursday, October 20, 2011

    स्नेह'ज्योती'

    रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात अनेकविध फुलांचे सौंदर्य पहायला मिळते. मात्र घराडी गावातील दुर्गम भागात या फुलांइतकेच दृष्टी नसताना दृष्टीपथास असणारं आणि दृष्टीपलिकडील विश्व जाणू शकणाऱ्या 'देवाघरच्या फुलांचं' सौंदर्य वर्णनापलिकडले आहे. जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने शनिवारी स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहवासात काही क्षण घालविल्यावर हाच अनुभव आला.

    निमित्त होतं कोकण विभागाचे माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ यांच्या 'प्रकाशमय' ग्रंथाच्या ब्रेल आवृत्तीच्या प्रकाशनाचे. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांनीच हे ब्रेल रुपांतर केले आहे. रत्नागिरीहून मंडणगडला जायला साधारण चार तास लागतात. खेडहून पालगडमार्गे पुढे गेल्यावर दहागावपासून तीन किलोमीटर अंतरावर घराडी गाव आहे. गावाकडे जाणारा कच्चा रस्ता आहे. गावात प्रवेश केल्यावर डावीकडे उंचावर जुना वाडा दिसतो. हेच विद्यालयाचे कार्यालय. विद्यालयाच्या संस्थापिका सुनिला कामत यांनी त्यांच्या आईच्या आजोळीचे हे घर अंध विद्यालयासाठी दिले आहे.

    आत प्रवेश करताक्षणीच अत्यंत प्रेमाने स्वागत झाले. कार्यक्रमासाठी पुण्याहूनही अंध विद्यार्थींनींचा एक ग्रुप आला होता. त्यातली मैथीली चव्हाण जपानी भाषा शिकते आहे. समीरा शेख ही नृत्यकलेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करते आहे. त्यांच्या प्रगतीविषयी जाणून घेतल्यावर त्यांच्या प्रयत्नांना सलाम करताना शब्दांचा उपयोग कसा करावा हा प्रश्न होता. कारण मानवी सामर्थ्याचे अनेक किस्से यापूर्वीदेखील ऐकले होते. मात्र निसर्गाने दिलेल्या अपंगत्वाविषयी कोणतीही तक्रार न करता त्याच्याशी सामंजस्याने सहचर्य करीत काळाच्या पडद्यावर आपल्या कर्तुत्वाची खूण सोडण्याचे प्रयत्न काही वेगळेच होते. शिवाय बोलताना चेहऱ्यावरचं स्मित कायम...त्यांच्या अंधत्वाविषयी वाईट वाटताना मात्र या भाग्याचा हेवा वाटत होता. जणू जीवनातील सगळी दु:खे त्यांच्यापासून कोसो दूर असावी किंवा त्यांनी ती आपल्या कौशल्याने सहजपणे बाजूला सारली असावी...

    ...सुनिलाताई आणि प्रतिभाताई दोघी बहीणींनी शाळेतल्या मुलांना आईची माया दिली आहे. त्यामुळे आग्रहाने कोकम सरबत आम्हाला देताना त्या मुलांच्या कलेविषयी भरभरून बोलत होत्या. या मुलांची स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदींकडे लक्ष देताना त्यांना पाच किलोमीटर दूरच्या गावात संगीताच्या शाळेला आपल्या गाडीत नेण्याचे कष्टही त्या घेतात. श्री.कामत हे सेनेतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा वायुसेनेत अधिकारी तर मुलगी अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून काम करते. घरात सर्व समृद्धी असताना अंध मुलांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी या भगिनींनी आपल्या प्रेमाची 'ज्योती' इथे लावली. कष्टाने आणि जिद्दीने कुठलीही मदत नसताना त्यांनी शाळेची सुरुवात केली. त्यांच्या सुदैवाने समाजातील अनेक हात त्यांना सहकार्य करण्यासाठी सरसावले, उत्तम जैनसारखे तरुण सोबत आले आणि पाहता-पाहता नजरेत भरेल असे कार्य उभे राहिले...

    ...शाळा सुंदर बांधली आहे. स्वतंत्र वर्ग खोल्या, संगीतासाठी हॉल, वाचन कक्ष, भोजन कक्ष, बापट दाम्पत्याने उभारून दिलेला नाना-नानी कक्ष असे विविध कक्ष शाळेत आहेत. संपूर्ण डोंगरावर जेसीबीने सपाटीकरण करून शाळा उभारल्याचे सुनिलाताईंनी सांगितले. शाळेच्या परिसरात आणि वर्गात स्वच्छता दिसत होती. परिसरात छान हिरवळ तयार करण्यात आली आहे. मुलांना दिसत नसले तरी निसर्गाचा छान सहवास देण्यासाठी या भगिनींनी त्यासाठी दीड वर्ष खटाटोप केल्याचे कळल्यावर कौतुक वाटले.

    शाळेच्या भिंतीवर सर्व शिक्षा अभियानाचे बोधचिन्ह होते. त्यात पेन्सिलीऐवजी ब्रेल लिपीसाठी वापरल्या जाणाऱ्या टोच्याचा उपयोग करण्यात आला होता. या टोच्या सहाय्याने सहा टिंबांवर आधारित ही लिपी असण्याची माहिती आम्हाला देण्यात आली. बाजूला चित्रात असलेल्या पोपटाच्या तोंडात एक पत्र होते. या पत्रावर 'तुमचे भाग्य तुमच्या हाती' असे शब्द लिहिले होते. शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहिल्यावर जणू ते विद्यार्थीच हा संदेश देत असल्याचे वाटले. चिमुकल्या आशिकाने ब्रेल लिपीतील कार्यक्रमाबाबतची सूचना भराभर वाचून दाखविली. विशेष म्हणजे ही मुले पायऱ्यांवरून न गडबडता चढत-उतरत होती. आयुष्याचा चढ चढताना त्यांनी स्पर्श आणि संवेदनेचे छान गणित सोडविले आहे. म्हणून त्यांच्या जीवनात हास्य आहे, सोपेपणा आहे, सहजता आहे. धडपड, निराशा, वेदना यापासून ते खूप दूर आहेत. नव्हे या गोष्टींनी त्यांच्या प्रयत्नांपुढे शरणागती पत्करली आहे...

    ...भुजबळ साहेबांसह शाळेचा फेरफटका मारल्यानंतर कार्यक्रमस्थळी आलो. कार्यक्रमाची तयारी करताना दोन्ही बहिणी अगदी घरचं कार्य असल्याप्रमाणे धावपळ करीत होत्या. मधूनच मुलांच्या डोक्यावर हात फिरवून 'आज पाहुणे आले, छान गाणं म्हणणार ना' असं म्हणत त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. पाहुण्यांचे स्वागत, त्यांना माहिती देणे, स्टेजची तयारी, पारितोषिके...ही धावपळ सुरुच होती. शाळेचा कर्मचारी तल्लीनतेने काम करीत होता. त्याच्यावर या परिसरात कसे संस्कार झाले असतील याची कल्पना त्याच्या उत्साहाने होणाऱ्या हालचालींवरून दिसत होती. शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाची तयारी करण्यात तल्लीन होते.

    पाहुण्यांचे आगमन झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरूवात झाली. पाहुण्यांमध्ये भुजबळ साहेबांसोबतच ब्रेल लिपीतील पहिले साप्ताहिक काढणारे 'स्पर्शज्ञान' साप्ताहिकाचे संपादक स्वागत थोरात, सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर, दापोलीतील प्लास्टीक मुक्तीसाठी झटणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे आदींचा समावेश होता. मुलांनी सादर केलेल्या कलेला या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आशिका शेळगे हीने 'घननिळा लडिवाळा' हे भावमधूर गीत सादर केले. आशिषने गायलेले 'गणपती बाप्पाची पमपम छान','काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं' या गीतांनी धमाल उडवून दिली. शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या 'दृष्टी' या नाट्य प्रवेशात चिमुकल्या मनिषच्या गावरान संवादांनी सर्वांना भरभरून हसविले. पुण्याहून आलेल्या समिराचे कथ्थक प्रकारातील 'गद्भाव' सुंदरच झाले. आम्ही हे सर्व खुर्चीत बसून पहात असताना मात्र प्रतिभाताई आणि सुनिलाताई मात्र घराच्या पायऱ्यांवर असून आईच्या मायेने आपल्या या लेकरांचं कौतुक पहात होत्या. डोंगरावर हा स्वर्ग का फुलतोय हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव समजावून घेतल्यावर जाणून घेण्याची कुणालाच गरज वाटणार नाही.

    कार्यक्रम संपल्यावर भोजनही तेवढेच चविष्ट आणि गावाकडची आग्रहाने वाढण्याची पद्धत म्हणून मसाला भातावर सर्वांनी ताव मारला. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वांनी मिळेल त्या जागी बसून जेवणाची चव घेतली. या 'स्नेह'वास्तूत एकमेकांचा स्नेह वाढावा यासाठी निसर्गानेच ही खेळी खेळली असावी. (एरवी शहरात हे दिसतयं कुठे) जेवणानंतर निरोप देतांना प्रत्येकाला अंध विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कागदी पिशव्या प्रत्येकाला देतांना सुनिलाताई मुलांच्या कलेचे कौतुक करीत होत्या. आलेल्या पाहुण्यांना आपल्या या चिमुकल्यांचं किती सांगावं असं त्यांना झालं होतं. पाऊस थांबल्यावर आम्ही या सर्व सहृदयी माणसांची निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


    'प्रभूची लेकरे सारी,
    तयांना सर्वही प्यारी,
    कुणा ना तुच्छ लेखावे,
    जगाला प्रेम अर्पावेll'

    या साने गुरुजींच्या 'वैश्विक' प्रार्थनेच्या ओळी गुणगुणत पालगडला त्यांच्या जन्मगावी पोहचलो. रिमझीम पावसात त्यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं. ते ज्या प्राथमिक शाळेत शिकले त्या शाळेकडे एक नजर फिरविली. जगावर प्रेम करण्याचे संस्कार करणारी ही तीर्थक्षेत्रे आजही प्रेरणा देणारी आहेत हे त्याठिकाणी अनेक युवकांनी लिहीलेल्या प्रतिक्रियेवरून लक्षात आले.

    केवळ दहा किलोमीटरच्या परिसरात जगावर भरभरून प्रेम करणाऱ्या गुरुजींचे जन्मस्थान आणि गुरुजींचा संदेश अक्षरवत मानून स्नेह'ज्योती' तेवत ठेवणारी अंध मुलांची शाळा असावी हा खरोखरच सुवर्णयोग असावा. परतीच्या प्रवासात,

    'सदा जे आर्त अतिविकल
    जयांना गांजनी सकल,
    तया जाऊन हसवावे,
    जगाला प्रेम अर्पावेll'

    ही प्रार्थना गुणगुणणे सुरूच होते. अर्थात त्या स्नेहमय कार्यक्रमाने उल्हासित झालेले मन आणि परिसरातील निर्मल निसर्गाच्या सहवासात गुरुजींच्या पवित्र जन्मस्थानाचा स्पर्श झाल्यानंतर मनात अशी भावना निर्माण होणे तेवढेच स्वाभाविक आहे. म्हणून अशा 'तीर्थक्षेत्रांना' आवर्जून भेट द्यावी असे सारखे वाटते.

  • डॉ.किरण मोघे