Sunday, July 29, 2012

जनलोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे???


१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा"लोकायुक्त" निवडला जाईल.
२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सरकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.
३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जा...स्तीत जास्त १ वर्षआणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.
४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.
... ... ... ५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? ...
......आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूलकेला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.
६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचेकाम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोगजास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.
७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय !
८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही!या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.
९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.
१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरु द्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.
११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.
आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे.

                                                   Sudhir Choudhari

Thursday, July 26, 2012

महाराष्ट्र इतिहास


महाराष्ट्र इतिहास 
महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.


महाराष्ट्र भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ :
दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

विस्तार - महाराष्ट्राची पुर्व-पश्र्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.

क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.

महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस - गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्र्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.


महाराष्ट्र उद्योग:
महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. तर मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते.
राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. ऑगस्ट १९९१ ते डिसेंबर, २००८ या कालावधीत ५,०४,६८९ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १४,९७५ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २००८ -०९ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)
    महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :
  • १. कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.
  • २. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
  • ३. वन उत्पादनांवर आधारित उद्योग - लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.
  • ४. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.
त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन व मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.


मराठी भाषेचा इतिहास
भूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा -
एखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात.

उद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (तुळपुळे, १९७३ पृ. ५)
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य
दिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे

त्यात धिप्पाड, सावळ्या, काटक, काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट असं भाषेचं नाव आलं आहे. मराठीच्या अस्तित्वाविषयीचे हे अप्रत्यक्ष पुरावे आहेत. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात. (तुळपुळे, १९७३, पृ. ५-६)

कायदयाच्या गोष्टी


शेतकरी हा शेतजमिनीला काळी आई मानतो व त्याचे या आईवर अतोनात प्रेम असते. गावठाणामध्ये शाडुची माती आणुन शेकडो वर्षापासुन घर बांधुन राहात असलेले लोकं गावठाणाला पांढरी असे संबोधत  तर प्रत्यक्ष पिके घेत असलेल्या काळया शेतजमिनीला काळीआई असे संबोधत.मी या पांढरीमध्ये जन्माला आलो आणि काळया आईमध्येच मरणार असं म्हणणा-या शेतक-यांच्या कित्येक पिढया शेतीमध्येच गेल्या आहेत.  शेतजमिन आणि शेतकरी यांच्यातील अतुट नाते लोक साहीत्य, संत साहीत्य, ग्रामीण कथा व कविता यामधुन प्रकट झालेले आहे.
 
 स्वातंत्र्यानंतर धरणे, तलाव, औद्योगिक वसाहती, नागरी वसाहती , विकास प्रकल्प, गृहनिर्माण प्रकल्प,  सेझ अशा अनेक कारणांमुळे शेतकरी विस्थापित होत आहेत. मुंबई, पुणे , नाशिक, औरंगाबाद, नागपुर, अमरावती, अशी वाढती महानगरे आणि जवळपास सर्व महानगरपालीका व नगरपालीका क्षेत्राच्या जवळ घरांच्या गरजेमुळे जमिनी बिगरशेतीकडे  व घरे बांधण्याकडे वर्ग होत आहे.  अशा जमिनीपोटी लाखो रुपये हातात येणारा शेतकरी सुध्दा थोडयाच वर्षात कफल्लक झाल्याची सुध्दा राज्यात असंख्य उदाहरणे आहेत. मोठया प्रमाणावर अचानक हाती आलेला हा पैसा मुलत: चैनीवर, मोटार गाडयांवर व अनावश्यक वस्तुंवर खर्च केल्यामुळे जमिन पण गेली व पैसा पण संपला अशी विचित्र अवस्था झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जागतिकीकरण व वाढते शहरीकरण या पार्श्वभुमीवर शेतकऱ्याला आपल्या जमीनीबद्दल व आपल्या कुटुंबाबद्दल निर्णायक भुमिका ठरवावी लागेल.
 
गेल्या ५० - ६० वर्षात जनजीवनामध्ये प्रचंड व वेगाने बदल झाला आहे. शेतीचे क्षेत्र सुध्दा त्यास अपवाद नाही. १९५०-६० च्या दशकात अपुऱ्या साधनांसह जुनाट कृषि अवजारे वापरणारा, रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करणारा, मोटेने पाणी काढणारा शेतकरी मधल्या ५० वर्षात बदलुन आता अत्याधुनिक ट्रॅक्टर वापरणारा, ड्रीप इरीगेशन करणारा, अति रासायनिक वापरामुळे पुन्हा संेद्रीय शेतीच्या वळणावर उभा असलेला , प्रचंड भांडवली गुंतवणुक करावी लागलेला शेतकरी आता अधिकच गोंधळलेला वाटतो. पिढयानपिढया शेती करणारा व शेतीतुन प्रचंड आनंद मिळविणारा शेतकरी प्रचंड भांडवली खर्चाची झालेली ही शेती टिकणे शक्य नाही अशी मनोमन खात्री पटल्यामुळे, एकत्र कुटुंब पध्दतीमुळे संपुष्टात आल्यामुळे, नव्या पिढीची शेती सोडुन अन्य क्षेत्राकडे चालु असलेली वाटचाल स्पष्ट दिसत असल्यामुळे अधिक हळवा झाला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे इतर अनेक कारणांबरोबरच शेतकऱ्यांच्या मनातील ही घालमेल हे सुध्दा एक कारण असावे.
 
दररोजच्या वृत्तपत्रात आपण ज्या बातम्या वाचतो त्यामध्ये जमिनीवरुन झालेली भांडणे, त्यावरुन      झालेले खुन, मारामा-या इत्यादी, अशा प्रकारच्या बातम्यांचा मोठया प्रमाणावर समावेश असतो. त्याचबरोबर सर्वसामान्य माणुस “ कायदा गाढव आहे ” हे वाक्य सर्रास वापरतांना आपण पाहतो. शेतक-यांमध्ये जमिनीवरुन होणा-या भांडणाची संख्या फार मोठी आहे व गेली शेकडो वर्षे हे वाद चालु आहेत. या सर्व वादांच्या मागे मानवाच्या महत्वाकांक्षा, इर्षा, विरोध, लोभ या मुलभूत प्रवृत्ती दडलेल्या आहेत. गेल्या २० वर्षात मी उपजिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी म्हणुन काम करीत असतांना    शेतक-यांमधील वादांच्या ३-४ हजारावर केसेसमध्ये निकाल दिलेले आहेत. लहानलहान मुद्यांवरुन सुरु होणारी ही भांडणे माणसांचे संपुर्ण आयुष्य, वेळ व पैसा खर्च करणारी तर आहेतच पण संपुर्ण जीवनच एखाद्या खटल्यामुळे वाया गेलेली सुध्दा हजारो कुटूंबे आज आपल्याला पहायला मिळतात.

संपुर्ण भारतात आज सुमारे ४ कोटी खटले वेगवेगळया न्यायालयात चालू आहेत. या प्रत्येक खटल्यामध्ये सर्वसाधारणपणे पाच ते दहा पक्षकार असतात. किमान दोन पक्षकार आहेत असे गृहीत धरले तरी या देशातील ८ कोटी पक्षकारांना व त्यांच्या कुटुंबाना खटल्याची झळ बसली आहे. प्रत्येक कुटुंबातील सरासरी ५ माणसे सदर खटल्यात गुंतलेली धरली तर सुमारे ४० कोटी माणसांचा संबंध कोणत्या ना कोणत्या तरी खटल्याशी निश्चितच येतो. याचा अर्थच असा की, भारताच्या लोकसंख्येच्या १/३ लोक हे सकाळी उठल्यापासुन वकील, कागदपत्रे, पोलिस स्टेशन, दिवाणी / फोजदारी / महसूली व इतर  न्यायालये, रेकॉर्डरुम या सगळयात गुंतलेले आहेत.
 
अशा परिस्थितीत आपल्याला प्रचंड आनंद दिलेली शेती पुढच्या पिढीकडे सुरक्षितपणे कशी सुपुर्द करता येईल व त्यासाठी त्याने कोणती कायदेशीर काळजी घेतली पाहीजे,  हे कायदयाच्या गोष्टींच्या द्वारे सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे .
 
शेखर गायकवाड

Wednesday, July 25, 2012

कावीळ रोग... चला दक्षता घेऊ या !

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काविळीच्या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागले असून इचलकरंजी शहरात काविळीमुळे काही रुग्ण दगावले आहेत. सांगली व मिरज शहरातही कावीळचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होवू लागले आहेत. कावीळ रोगाबाबत जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य ती दक्षता व काळजी घेतल्यास आणि वेळेत उपचार केल्यास कावीळ निश्चित बरी होते असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.

सांगली जिल्ह्यात विशेषत: सांगली व मिरज शहरामध्ये कावीळ रोगाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेवून कार्यवाही सुरु केली आहे.

सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागाने साथ रोग नियंत्रणासाठी १४ दक्षता पथके नियुक्त केली असून जिल्हा व तालुकास्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

काविळीची लक्षणे
• कावीळ झालेल्या रुग्णांचे डोळे पिवळे धमक होतात
• लघवी पिवळी होते
• माणसाचे वजन घटते
• उलटी व अतिसार होणे
• ताप येणे
• पोटात दुखणे
• यकृतावर सूज येणे
• अशक्तपणा
• थकवा जाणवणे आदी लक्षणे कावीळ रोगाबाबत रुग्णामध्ये आढळून येतात असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी सांगितले आहे.

खबरदारीचे उपाय
• प्रत्येकाने पाणी उकळून थंड करुनच पिणे
• कावीळची साथ असणाऱ्या भागात न जाणे
• जेवणापूर्वी व शौचास जावून आल्यानंतर हात धुणे
• उघड्यावर शौचास न बसणे
• बाहेरचे खाद्य पदार्थ न खाणे आदी बाबत खबरदारी घेण्याची गरज आहे असे डॉ. शरद घाडगे यांनी सांगितले आहे.

काविळीवर लस उपलब्ध आहेत. तीन आठवडयामध्ये या लसीने रुग्ण बरा होतो. रुग्णांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेवून तपासणी करुन घ्यावी. शक्यतो घरगुती औषधोपचार करु नयेत असे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वापचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भागवत यांनी सांगितले आहे.

सर्वसामान्यपणे ए.बी.सी. आणि इ अशी चार प्रकारची कावीळ रुग्णामध्ये आढळून येते. कावीळ हा आजार साथीच्या स्वरुपात येण्याची शक्यता असते.

ए आणि बी ही कावीळ तुरळक प्रमाणात आढळून येते. सी ही कावीळ रक्त संक्रमणामुळे होते. बी प्रकारची कावीळ ही रक्तातील विषाणू आाणि लैंगिक संबंधामुळे होवू शकते. कधी कधी दूषित पाण्यामुळेही बी प्रकारची कावीळ होते.दूषित पाण्यातील विषाणूमुळे होणाऱ्या ए आणि ई या प्रकारातील काविळीचा प्रसार मात्र वेगाने होतो.

हा आजार झालेल्या रुग्णांची विष्ठा ड्रेनेज आणि सांडपाण्याच्या किंवा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याशी येणारा संपर्क यांच्यामुळे ही कावीळ झपाट्याने पसरते. सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी काविळीचे विषाणू पसरतात.ए आणि ई ही कावीळ दूषित पाण्याबरोबरच घरातील पाण्यापासूनही होते. कधीकधी कुपनलिकेच्या पाण्यातून या विषाणूचा धोका जास्त असतो.

काविळीची लागण झालेल्या रुग्णंाच्या संख्येच्या प्रमाणात या आजाराने रुग्ण दगावण्याची संख्या अत्यल्प असते. पण या आजाराचे गांभीर्य मात्र कमी होत नाही. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृध्दांमध्ये काविळीचा प्रादुर्भाव जास्त होतो.काविळीचे विषाणू मारण्याचे औषध अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, मात्र उपचाराने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवून रुग्ण बरा होतो.अधिकृत मान्यताप्राप्त आयुर्वेदिक डॉक्टरांकडून काविळीवर उपचार घेतले जातात.

पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनीच कावीळ रोगाबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कावीळ या आजाराच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी महापालिकेच्या, नगरपालिकेच्या, आरोग्य विभागाशी त्वरीत संपर्क साधावा.


  • दिलीप घाटगे,माहिती अधिकारी, सांगली
  • पीककर्जापासून शेतकरी वंचित राहणार नाहीत

    राज्यातील शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाहीत अशी ग्वाही सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज विधानपरिषदेत विरोधी सदस्यांच्या पीककर्जाबद्दलच्या ठरावावरील चर्चेला उत्तर देताना दिली. भाजपचे पांडुरंग फुंडकर आणि इतर सदस्यांनी मांडलेल्या या ठरावात सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाल्याचे नमूद करुन सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली होती.

    नागपूर, वर्धा, बुलढाणा, उस्मानाबाद, जालना आणि धुळे-नंदुरबार या सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकावर एप्रिल २०१२ मध्ये नवीन ठेवी स्वीकारणार नाहीत असे बंधन रिझर्व्ह बँकेने घातले. त्यामुळे या बँका अडचणीत आल्या . शेतकऱ्यांना या बँकाकडून पीक कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन या कोंडीतून शेतकरी बाहेर पडावेत म्हणून सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चर्चेला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

    या सहा बँकापैकी जालना वर्धा आणि उस्मानाबाद या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका येत्या सप्टेंबर अखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करुन निर्बंधमुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सहकारी बँकेने या बँकांना पीककर्ज वाटपासाठी ५७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीकृत बँकाही या सहा जिल्हा बँकांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना १३८ कोटी रुपयांचे पीक कर्ज देणार आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची पीककर्जाची गरज पूर्ण होईल असे सहकार मंत्री म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी २४ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. त्यातील ५३-५४ टक्के हिस्सा राष्ट्रीकृत बँका आणि उर्वरित हिस्सा सहकारी बँका उचलतील असे ते म्हणाले.

    शुक्रवारी पर्यावरण संतुलना संबंधात विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मांडलेल्या ठरावावर जी चर्चा झाली त्या चर्चेला आज पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी उत्तर दिले. प्रदूषण रोखण्यासाठी शासकीय उपाययोजनांबरोबर जनतेच्या सहभागाची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्मारक उभारण्यात येणार आहे त्याच्या जागेत बदल झालेला नाही. असा निर्वाळा त्यांनी दिला. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तत्वत: मंजुरी द्यावी म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी पत्रव्यवहार चालू आहे. प्रकल्प अहवाल सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    आत्मसमर्पण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचे पुनर्वसन आणि अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरील कारवाई यासंबंधीच्या प्रश्नावर प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी भर दिला. लक्षवेधी सूचनावरील निवेदनात बीड शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्याच्या कामासंबंधी आस्था दाखविलेल्या सदस्यांनी बीडमधील प्रस्तावित उड्डाणपुलाला मात्र एकमुखाने विरोध केला, त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांना या विरोधाची दखल घेण्याचे निर्देश दिले.

    विधानसभा मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून आलेले दहा सदस्य त्यांचा सहा वर्षांचा कालावधी पूर्ण करुन या आठवड्यात निवृत्त होत आहेत. त्यांच्यापैकी माणिकराव ठाकरे आणि जयंत पाटील पुन्हा निवडून आले आहे उर्वरित आठ सदस्यांना आज सभागृहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आठही सदस्यांच्या कार्याचे आणि गुणवैशिष्ठ्यांचे मार्मिक विवेचन केले एस.क्यु.जामा , अरुण गुजराथी, उल्हास पवार, राजन तेली, सय्यद पाशा पटेल, केशवराव मानकर, परशुराम उपरकर आणि श्रीमती उषा दराडे या सदस्यांच्या निवृत्तीची उणीव सभागृहाला जाणवेल असे मुख्यमंत्री चव्हाण, अन्य सदस्य आणि सभापती शिवाजीराव देशमुखांनी सांगितले. राजकारणातून आणि समाजकाराणातून निवृत्त न होता हे सदस्य सार्वजनिक जीवनात योगदान देतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवृत्त होणाऱ्या सदस्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

    २९ ऑग्स्ट २००५ पासून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ३६५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यातील अनेकांचे पुनर्वसन आतापर्यंत सरकारने केले आहे. उर्वरित व्यक्तींचे पुनर्वसन येत्या तीन महिन्यात कालबद्ध कार्यक्रम राबवून पूर्ण केले जाईल असे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिवाकर रावते यांच्या प्रश्नावर सांगितले. धनादेशाव्दारे बक्षीस, घरासाठी भूखंड, घरकुल , स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आणि शेती या माध्यमातून हे पुनर्वसन होत आहे. २५ पेक्षा अधिक आत्मसमर्पिताना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती गृहमत्र्यांनी दिली नक्षलवाद्यांच्या चळवळीला आता धंदेवाईक स्वरुप प्राप्त झाल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. या चळवळीचे नेते आता शहरामध्ये आरामात राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात दरड कोसळण्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी परशुराम उपरकर यांच्या प्रश्नावर दिला.


  • वसंत देशपांडे
    (मो. ८८८८८४९००५)
  • दोन विधेयकावर उद्बोधक चर्चा

    विधान परिषदेत आज दोन सरकारी विधेयकावर ८४ कायद्यातील मुंबई हा शब्द वगळून त्या जागी महाराष्ट्र हा शब्द घालण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकाच्या उद्देश व कारणांचे निवेदन वादग्रस्त ठरले. ''१ मे १९६० पासून अंमलात आलेल्या मुंबई पुनर्रचना कायद्यान्वये नवीन गुजरात राज्याची स्थापना झाली आणि उर्वरित मुंबई राज्य हे महाराष्ट्र राज्य या नावाने पुढे कायम राहिले'' या वाक्यावर शिवसेना गटाचे नेते दिवाकर रावते आणि शिवसेनेचे रामदास कदम यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी झालेल्या लढ्याचा उपमर्द या वाक्याने झाल्याचे त्यांनी सांगितले. या वाक्याच्या समावेशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले आणि लोकभारतीचे कपिल पाटील यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली. सदस्यांच्या या भावनांची दखल गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी घेतली आणि वादग्रस्त वाक्य वगळण्यास सहमती दर्शविली. उद्देश व कारणांचे निवेदन विधेयकाचा भाग नसतो. त्यामुळे मूळ विधेयक मागे घेण्याची आवश्यकता नाही, असे गृहमंत्री म्हणाले.

    सन २००४ च्या राज्य अल्पसंख्याक आयोग कायद्यात सुधारणा सुचविणाऱ्या विधेयकावरील चर्चेतून अल्पसंख्याक समाजाच्या व्यथांना वाचा फुटली. सय्यद पाशा पटेल आणि एस.क्यु.जमा यांनी सच्चर समितीच्या अहवालाचा उल्लेख केला. अल्पसंख्याक आयोगाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावी व्हावे म्हणून दिवाणी न्यायालयाचे अधिकार आयोगाला या विधेयकाद्वारे मिळणार आहेत. अन्य राज्यात अशी तरतूद याआधी झाली आहे. महाराष्ट्र सरकारने विलंब करायला नको होता, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री फौजिया खान यांनी चर्चेला उत्तर देताना सर्व अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले याकडे लक्ष वेधले. अल्पसंख्याक विकास विभागाने रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार, उद्योग या क्षेत्रात राबविलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

    प्रश्नोत्तराच्या तासातील बरेच प्रश्न शालेय शिक्षण विभागाशी निगडीत होते. १९७२ नंतर सेवेत आलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत नसल्याबद्दल रामनाथ मोते आणि इतर अनेक सदस्यांनी नापसंती व्यक्त केली. तेव्हा या शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी संधी देण्यात आली होती. परंतु ते प्रशिक्षित झाले नाहीत असे सांगून शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी सरकारी निर्णयाचे समर्थन केले. त्यांचे हे स्पष्टीकरण सदस्यांना पटले नाही. सदस्यांच्या आग्रही भावना लक्षात घेऊन माणुसकीच्या दृष्टीकोनातून या प्राथमिक शिक्षकांना निवृत्ती वेतन मंजूर करण्याचा विचार व्हावा, असे निर्देश सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राज्यमंत्र्यांना दिले. १९७२ नंतर सेवेत आलेल्या १६२८ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांपैकी ३९२ शिक्षक निवृत्त झाले असून १२३६ शिक्षक सेवेमध्ये आहेत. त्यांना निवृत्ती वेतन मंजूर केल्यास २० कोटी रूपये खर्च येईल, अशी माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.

    राज्यातील अनेक शिक्षकांनी अपंग असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून विविध योजनांचा लाभ घेतल्यासंबंधीच्या प्रश्नावर सरकारकडे अपुरी माहिती असल्यामुळे सभापतींनी तो प्रश्न राखून ठेवला. अनिल भोसले यांनी हा प्रश्न विचारला होता.

    ऑक्टोबर २०११ मध्ये झालेल्या विद्यार्थी पटपडताळणीमध्ये बोगस विद्यार्थी आढळलेल्या शाळांवर आणि संबंधितांवर कारवाई करण्याबाबत २ मे २०१२ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे श्रीमती फौजिया खान यांनी रमेश शेंडगे आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर सांगितले.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्तीच्या ३ लाख ८५ हजार ११६ रूपयांचा अपहार झाल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी रामनाथ मोते व इतर सदस्यांच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना दिली. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याची पोलिसांकडून चौकशी चालू असल्याचे त्या म्हणाल्या. सन २००७-०८ ते २०११-१२ या कालावधीत जिल्ह्यातील ९८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    स्त्रीभ्रूण हत्या बंद व्हावी आणि बालिकांचा जन्मदर वाढावा यासाठी 'सुकन्या कन्या' योजना शासनाच्या विचाराधीन आहे, असे महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी जयवंतराव जाधव आणि इतर अनेक सदस्यांच्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले. ही योजना प्रायोगिक तत्वावर अनुसूचित जाती-जमाती मधील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील दोन अपत्यापर्यंत फक्त मुलींसाठी लागू असेल. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीला एक लाख रूपये प्रदान करण्याची तरतूद या योजनेत आहे. त्यासाठी वार्षिक २७३ कोटी रूपये निधी लागेल. मंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधी सदस्यांनी केलेल्या काही विधानातून गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांनी सभागृहाची बैठक दहा मिनिटे तहकूब केली.

    ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यासारख्या धार्मिक सण उत्सवात उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे रस्ते खराब होऊ नयेत म्हणून काही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांना स्थगिती देण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मान्य केली नाही. शहर खड्डामुक्त व्हावे या धोरणानुसार हे निर्बंध घालण्यात आल्याचे समर्थन राज्यमंत्र्यांनी केले.

    मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात उपस्थित केला होता. आज त्यावर निवेदन करताना नगरविकास राज्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगारांची २८ हजार १८ पदे असून त्यांच्यासाठी फक्त ६ हजार ३७४ घरे उपलब्ध आहेत, असे सांगून आश्रय प्रकल्प या योजनेअंतर्गत २२ हजार नवीन घरे बांधण्याचा पालिकेचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली.

    पुण्यातील बस वाहतुकीसंबंधात मोहन जोशी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना भास्कर जाधव यांनी बससंख्या, वाहन चालकांची संख्या, विद्यार्थी सवलत, पोलीस अनुदान यासंबंधी विस्तृत माहिती दिली. डिझेल आणि जकात माफी यासंबंधीचा निर्णय महानगरपालिकेनेच घ्यावयाचा आहे, असे ते म्हणाले.


  • वसंत देशपांडे
    (मो. ८८८८८४९००५)
  • रो.ह.यो.तील मजुरांची थकित देणी १५ ऑगस्ट पूर्वी अदा करण्याबाबत चर्चा

    राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांची प्रलंबित मजुरी १७ ऑगस्ट पूर्वी देण्याची घोषणा, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना, जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयकाला मंजुरी ही विधानसभेत आज झालेल्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये होती.

    विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाची सुरुवात सकाळी अकरा वाजता झाली. नवी मुंबई खारघर येथील खिमजी पालमजी छेडा शाळेत गणवेश खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले नाही, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी दिली. किसन कथोरे आणि इतर सदस्यांचा तारांकित प्रश्न होता. वसई येथील अर्नाळा येथील मच्छिमारी बंदराचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल, अशी घोषणा बंदर आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली. अबू आझमी आणि इतर सदस्यांचा तारांकित प्रश्न होता. राज्यातील विना अनुदान माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी मुल्यांकन करताना शासनाने हस्तक्षेप कमी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत पाहणी करावी, असे निर्देश अध्यक्ष दिलीप वळसे - पाटील यांनी दिले. सक्तीचे मोफत शिक्षण या कायद्याच्या अंमलबजावणी करीता उपाययोजना केल्या जात आहे याचीही माहिती सरकारने योग्यवेळी द्यावी अशी सूचना त्यांनी केली. कालिदास कोळंबकर आणि इतर सदस्यांचा प्रश्न होता.

    रोजगार हमी योजनेतील मजुरांची थकित देणी येत्या १५ ऑगस्ट पूर्वी अदा करण्याबाबत उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून १६७ लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. सदस्य विजयराज शिंदे यांचा तारांकित प्रश्न होता.

    जालना जिल्ह्यातील पोखरी केंधळी येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेत अनियमितता झाल्याने डाटा एन्ट्री ऑपरेटरला कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती रोहयो राज्यमंत्री देवकर यांनी दिली. संतोष सांबरे यांचा तारांकित प्रश्न होता. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने निकृष्ठ दर्जाचा कागद खरेदी केला नाही. तसेच या खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नाही असे शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत मोकाटे यांचा प्रश्न होता.

    प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात औद्योगिक विकास महामंडळाचे अहवाल, महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थाच्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल ग्रामविकास मंत्र्यांनी सादर केला. विधानसभा सदस्य अनुपस्थिती अहवाल समिती प्रमुख दिनेश पडोळे यांनी मांडला. या अहवालात नमूद केल्यानुसार सदस्य केवलराम काळे यांनी आपण ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्याने गैरहजर राहिल्याचा खुलासा केला.

    लक्षवेधी सूचनांच्या कामकाजात इतर मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दीड वर्षापासून प्रलंबित असल्याबाबत दोनही बाजूचे सदस्य आग्रही मागणी करत होते. या विषयावर मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवू असे उत्तर सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिले. या विषयावरून गोंधळामुळे कामकाज तहकूब झाले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत ४०० कोटी रुपये देण्याची तयारी श्री. मोघे यांनी दर्शविली. तेव्हा पुन्हा गदारोळ झाला. अखेर या विषयावर सत्र संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे असे निर्देश तालिका अध्यक्ष उत्तमराव ढिकले यांनी दिले.

    भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी करताना आयआर दर्जाच्या धानाची खरेदी ए ग्रेड ऐवजी बी ग्रेड मध्ये करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त नाही. मात्र या बाबत समिती गठित करून चौकशी करण्याचे आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. नाना पटोले आणि तर सदस्यांची लक्षवेधी सूचना होती.

    अकोला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नगरपरिषदेकडे वर्ग न करात खासगी संस्थेकडे हस्तांतरित केल्याप्रकरणी शाळा ताब्यात घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून कारवाई केली जात असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली. संजय गावंडे आणि इतर सदस्यांची लक्षवेधी होती.

    लक्षवेधीनंतर विधेयकांचे कामकाज पुकारण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक विचारार्थ घेण्यात आले. विदर्भातील अमरावती तसेच नागपूर विभागात शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या आहेत. या जमिनी राज्यपुनर्रचनेपूर्वी तसेच तेव्हाच्या विद्यमान कायद्यान्वये भाडेपट्ट्याने दिल्या असल्याने त्यांच्या पुनर्विकास अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर, हस्तांतरणीय विकास हक्कांचे हस्तांतर याबाबत तरतुदी समाविष्ट करण्यासाठी शासनाने जमिन महसूल संहिता १९६६ मध्ये सुधारणा प्रस्तावित करणारे हे विधेयक होते. या विधेयकात मुंबई आमि परिसरातील शासकीय भाडेपट्ट्याच्या जमिनी बाबतचाही समावेश करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस, प्रकाश मेहता यांनी केली. ही मागणी योग्य असल्याचे उत्तराच्या भाषणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई शहर आणि महाराष्ट्राचा समावेशही या विधेयकात करण्यात येत असल्याचे श्री. थोरात म्हणाले. औद्योगिक किंवा वाणिज्य प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या मुंबईतील जमिनीबाबत वेगळा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. नझुल जमिनीबाबत पूर्वलक्षी प्रभावाने वसुली मात्र केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकूण शासकीय जमिनींची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती येत्या तीन महिन्यात घेवून शासकीय वेबसाईटवर देण्यात येईल, अशी घोषणा श्री. थोरात यांनी केली.

    पश्चिम रेल्वेच्या मोटरमन बंदमुळे नोकरी करून घरी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत बाळा नांदगावकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे लक्ष वेधले. त्यानंतर अशासकीय कामकाज पुकारण्यात आले.

    हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना अशासकीय कामकाज सुरू होते.

    किशोर आपटे
    (मो.९८६९३९७२५५)

    आमचे वसतिगृह

    लातूर येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या निसर्गरम्य हवेशीर परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय शासकीय वसतिगृहाच्या इमारतीनी नयनरम्य आकार घेतला आहे. आपल्या जीवनाची रंगीबेरंगी स्वप्ने पहाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहामुळे आल्हाददायक व भावस्पर्शी अनुभवाचा अविष्कार होतो आहे. एक दिवस या वसतिगृहाला भेट देण्याची संधी मिळाली. या वसतिगृहाचे रूपडे ‍ पाहिले अन ख-याअर्थाने जाणीव झाली शासनाच्या लोककल्याणकारी धोरणाची.

    तालुकास्तरावरील वसतिगृहाव्यतिरिक्त मोठया जिल्ह्याच्या ठिकाणी विभागीय वसतिगृहाची संकल्पना राज्यातील सात ठिकाणी राबविली जात आहे. यामध्ये लातूरचा समावेश झाल्याने या परिसरातील मागासवर्गीय जातीतील विविध घटकांच्या विद्यार्थ्यांना लाभ होतो आहे. राज्यातील उर्वरित मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथे अद्याप वसतिगृह सुरु होत असून औरंगाबाद व लातूर येथे विभागीय वसतिगृह सुरु झाले आहेत. राज्यात तालुकास्तरावर सामाजिक न्याय विभागाची ३७१ एवढी मुलां-मुलीची शासकीय वसतिगृहे आहेत. त्यामध्ये आता या विभागीय वसतिगृहांची भर पडत आहे.

    उपलब्ध तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही या स्पर्धांना सामोरे जावून आपली प्रगती साध्य करणे या वसतिगृहामुळे शक्य झाले आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी नामवंत व प्रथितयश महाविद्यालये असल्याने अशा महाविद्यालयातून खेड्या-पाड्यातून व दुर्गम भागातून येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो आहे. सध्या या विभागीय वसतिगृहात ३५५ मुलांनी प्रवेश घेतला असून यावर्षासाठी जवळपास साडेसातशे नवीन अर्ज आले आहेत. प्रवेश प्रक्रियेअंती पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या वसतिगृहात सांस्कृतिक सभागृह, ग्रंथालय, व्यायामशाळा, संगणक प्रयोगशाळा अशा व्यक्तिमत्व विकासाच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत.

    विभागीय स्तरावरील या शासकीय वसतिगृहात २५० क्षमतेची चार युनिट आहेत. त्यापैकी मुलींसाठी २५० क्षमेतेचे एक युनिट आहे. या सर्व चार युनिटसाठी स्वतंत्र गृहप्रमुख व कर्मचारी यांची तरतुद आहे. प्रशस्तरित्या उभारलेल्या दोन इमारतीमध्ये प्रत्येकी १२८ कक्ष आहेत. प्रत्येक कक्षात चार विद्यार्थ्यांना रहाता येते. पंखा, टेबल, कॉट, कपाट, गादी बिछाना २४ तास पाणी इत्यादी मुलभूत सोयी कक्षात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वीजेची व्यवस्था डायरेक्ट एक्सप्रेस फिडरने केल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीचे झाले आहे. येथील विद्यार्थी लातूर शहरातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, अध्यापन, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषि इत्यादी महाविद्यालयात प्रवेशित असून वसतिगृहापासून शिक्षण घेण्याची संधी सर्वाना उपलब्ध आहे.

    सकाळी साडेपाच वाजल्यापासून दिनचर्या सुरु केली जाते. सकाळी ७-०० वाजता मुलांना भरपेट रुचकर व पौष्टीक नाश्ता दिला जातो. त्यामध्ये २०० एम.एल. दूध, दोन अंडी व आलटून पालटून पोहे, उपीट, शिरा, उसळ असा नाश्ता देण्यात येतो. मुलांच्या सोयीनुसार सकाळी ९-०० ते दुपारी २-०० वाजेपर्यंत जेवण दिले जाते तर रात्रीचे जेवण ७-०० वाजल्यापासून मिळते. आठवड्यातून दोनवेळा फिस्ट असते म्हणजेच नॉनव्हेज व गोड पदार्थ असलेल्या जेवणाचा आनंद मुले घेत असतात. विशेष म्हणजे मानसिक बळ वाढविण्यासाठी दहा दिवस विपश्यना शिबीराला उपस्थित राहण्याची सोय यामध्ये करुन देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने २६ जुलै, २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये वसतिगृहातील विद्यार्थ्यासाठी ३७ प्रकारच्या सोयी सुविधा जाहीर केल्या आहेत. त्यासर्व येथे दिल्या जातात. विभागीय वसतिगृह म्हणजे आता विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून भविष्यातील उज्वल नागरीक घडण्याकरिता मदत होणार आहे.


  • रामचंद्र देठे, माहिती अधिकारी, लातूर
  • अवैद्य बांधकामाना आळा घालण्याकरीता तीन महिन्यात धोरणात्मक निर्णय

    विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अवैघ बांधकामाच्या विषयावर गंभीर चर्चा झाली. सर्व शिक्षा अभियाना बाबतही चर्चा झाली. शिक्षण आणि आरोग्य या विषयावरील चर्चेला शासनाने दिलेले सविस्तर उत्तर हेच कामकाजाचे वैशिष्ट्य होते.

    विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सकाळी अकरा वाजता सुरु झाले. १३ जुलै रोजी प्रश्नोत्तराच्या तासात राखून ठेवलेल्या सर्व शिक्षा अभियानातील पुस्तक खरेही प्रकरणी घोटाळा झाल्याच्या विषयावर विरोधी पक्षांचा आक्षेप होता. या विषयावर चौकशी करण्याची तयारी राज्यमंत्री फौजीया खान यांनी दर्शवली पण विरोधी पक्ष फौजदारी चौकशी हवी असा आग्रह करत होते. त्यावेळी नेमकी कोणती चौकशी करणार याचा निर्णय विभागाने घेवून सदनाला अवगत करावे असा निर्देश अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

    वाशिम जिल्ह्यात वडगाव ते धावंडा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. याबाबत कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा येथे शासकीय जागेवर रिसॉर्ट चे काम झाले नाही असा निर्वाळा महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिला. विवेक पंडित यांचा तारांकित प्रश्न होता. या प्रकरणी सदस्यांच्या माहितीवर तपासणी करण्याची सूचना अध्यक्षांनी केली. चिमूर तालुक्यात गरडापार या गावात आदिवासींच्या शेतजमीनी शेतकरी नसलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न होता. या विषयावर सुनावणी प्रलंबित असल्याचे राज्यमंत्री सोळंके यांनी सांगितले, मात्र सकृतदर्शनी जी माहिती हाती आली आहे ती तपासून मूळ मालकाना जमिनी परत दिली जाईल असे ते म्हणाले. राज्यातील अवैध बांधकामे रोखण्याकरीता धोरणात्मक निर्णय येत्या तीन महिन्यात घेण्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. या विषयावर अशोक पवार यांचा प्रश्न होता. हा विषय अत्यंत चिंतेचा असल्याने कालबध्दपणे यावर निर्णय घेतला पाहिजे या करीता सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आपण दालनात घेवू अशी सूचना अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. राजुरा पंचायत समिती हद्दीत कलापथकाने कार्यक्रम न करताच निधी चा अपहार केला नाही अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली, या प्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी यांच्या मार्फत एका महिन्यात चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

    कागदपत्र पटलावर ठेवण्याचे कामकाज त्यानंतर घेण्यात आले. लोकलेखा समितीचा नववा अहवाल सदनात सादर करताना काही अधिकारी खोटी कारणे देवून समिती समोर हजर राहणे टाळतात अशी नोंद समिती प्रमुख गिरीश बापट यांनी केली. सरकारकडून देखील विधीमंडळ समित्यांच्या कामकाजाला महत्त्व दिले जात नाही असा आक्षेप त्यांनी घेतला. हे निरीक्षण गंभीर असल्याची टिपणी करत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाइतकेच समित्यांचेही महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

    सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी नियम ४७ अन्वये खुलासा केला. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळून याविषयावर चर्चा करायला तसेच फाईल्स दाखवायला आपण तयार आहोत असे ते म्हणाले. या विष्यावर विरोधक आक्रमक झाले तेव्हा गदारोळामुळे कामकाज दोनदा तहकूब करण्यात आले. अखेर येत्या दोन दिवसात चर्चा करण्याचे मान्य केल्यावर गोंधळ निवळला. परभणीचे पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या विरुद्ध रामप्रसाद बोर्डीकर यांनी विशेषाधिकार हक्कभंगाची सूचना दिली.

    नियम २९३ अन्वये शिक्षण आणि आरोग्य या विषयावरील चर्चेला आज राज्य सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यानी या प्रदिर्घ चर्चेला उत्तर देताना धर्मादाय कायद्यानुसार स्थापन केलेल्या रुग्णालयात १० टक्के खाटा गरीब गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देणे अनिवार्य करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय खात्याकडे प्रलंबित आहे असे ते म्हणाले येत्या वर्षअखेर राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यभर लागू करण्याची योजना असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली.

    शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी येत्या एप्रिल (२०१३) पर्यंत सर्व शाळांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अशी घोषण केली. दर्जेदार शिक्षणाकरीता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत. टप्याटप्याने १ ते १० चा अभ्यासक्रम देखील बदलण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल असे त्या म्हणाल्या. ३४ हजार शिक्षकांची पदे निर्माण केली जात असून प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक या संकल्पनेनुसार ती लवकरच भरण्यात येतील असे फौजीया खान यांनी स्पष्ट केले. सर्वकष मुल्यमापन पद्धती लागू करण्यात आल्याने दर्जेदार शिक्षण परिक्षा पद्धती घालून देण्याचा प्रयत्न शासन करत आहे असे त्यांनी सांगितले.

    हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना या विषयावर राज्यमंत्र्यांचे उत्तर सुरु होते.

    किशोर आपटे
    (मो.९८६९३९७२५५)

    विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लोकसहभागातून मदत

    शाळांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही चिंताजनक बाब होती. ही उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. तथापि ही केवळ शासनाची जबाबदारी न मानता पुढाकार घेणाऱ्या समाजाचे उदाहरण परभणी जिल्ह्यात पहावयास मिळाले आहे.

    तांडा म्हाणजे गावापासून दूर असलेली वस्ती. शिक्षणाचे कमी प्रमाण. ऊसतोड कामगारांची मुले कारखाना सुरु झाला की गाव सोडून जातात. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या आणि शाळेत शंभर टक्के उपस्थितीपट ठेवण्याचे शिक्षकांसमोरील आव्हान पेलत परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांड्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बी.डी.शिंदे, एस.व्ही.सिद्धेश्वरे, एस.के.इंद्राळे या शिक्षकांनी गावात शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

    पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष वापरामुळे कोणतेही ज्ञान-कौशल्य लवकर आत्मसात होते. यादृष्टीने संगणक हे आपल्याला आधुनिक जगाशी जोडणारे प्रभावी साधन आहे. संगणकाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून ते स्पर्धेच्या युगात धाडसीपणे वावरू शकणार आहेत. यामुळे आजच्या संगणकाच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना संगणकाची जवळून ओळख होणेही गरजेचे आहे. मुलांच्या मनातील संगणकाची भीती घालविण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने हाताळणी केली जाणे देखील आवश्यक असते.

    ही गरज लक्षात घेऊन या शाळेत शिक्षकांच्या सहकार्याने ३५ हजारांची लोकवर्गणी जमा करून शाळेला संगणक भेट देण्यात आला आहे. संतराम लक्ष्मण राठोड यांनी शाळेच्या नवीन इमारतीसाठी चार गुंठे जमीनही दान केली आहे. या माध्यमातून तांड्यांवरील नागरिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न झाला आहे.

    Tuesday, July 24, 2012

    पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाने शेतकरी झाला कोट्यधीश

    शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करणे कठीण नाही. मोर्शी येथील कृषी विज्ञान शाखेचे पदवीधर गजानन बारबुद्धे यांनी शेतीमध्ये सरस उत्पादन घेऊन हे सिद्ध केले आहे. त्यांनी शेतात लावलेल्या मिरची, हळद, अद्रक, काकडी, कारली, कापूस, चवळी या पिकांचे एक कोटीपेक्षा अधिक उत्पादन घेऊन विक्रम केला आहे.

    याविषयी बोलताना, पाणी आणि खतांचे योग्य नियोजन केल्याने मशागतीचा वायफळ खर्च, श्रम आणि वेळ वाचल्याचे आणि त्यामुळे चांगली शेती करू शकल्याचे गजानन यांनी सांगितले. पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान शेतात उभारणारे ते एकमेव शेतकरी ठरले आहेत. आज अनेकजण नोकरीच्या मागे लागून आणि जमीन विकून भूमिहीन झाले आहेत. आजही ८० टक्के शेतकरी आणि युवक म्हणतात, शेती परवडत नाही. त्यापेक्षा व्यवसाय करुन दुकानदारी थाटणे परवडेल. परंतु यांत्रिक पद्धतीची जोड दिली तर उत्तम शेती करता येऊ शकते, हे गजानन यांनी दाखवून दिले आहे.

    गजानन यांनी सहा वर्षापूर्वी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करुन आणि त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसाय सुरू केला. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरणे गरजेचे होते. त्यांनी कपाशी, मिरची ही पिके घेण्यास सुरुवात केली. नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादन भरभराटीला गेले. शेतात मशागतीनंतर साडेतीन चार फूटावर बेड पद्धतीने पिके घेणे सुरू केले. योग्य वेळेनुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करुन अल्पशा पाण्यावर त्यांनी उत्तम शेती केली. यातून उत्पादनात दरवर्षी वाढ होऊन आता ३८ एकर शेतजमिनीतून एक कोटी रुपयांपर्यंत उत्पादन निघू लागले आहे.

    यावर्षी त्यांनी हळद, अद्रक, कपाशी, मिरची, कारली, काकडी, गहू, एरंडी, चवळी ही पिकेसुद्धा १०० टक्के ठिबक सिंचनावर घेतली. शेतामध्ये पिकांचे नियोजन आणि मशागतीसाठी स्वयंचलित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान युनिट उभारले. तापमान नियंत्रण करण्याकरिता फॉगिंग सिस्टिम, खत आणि पाणी नियोजनाकरिता सेन्सर सिस्टिम लावण्यात आली. इलेक्ट्रीक कन्डक्टीव्हीटी आणि पाण्याची घनताही नियंत्रित केली जाते, यामुळे पिकांना योग्य वेळी प्रमाणबद्ध खत आणि पाणी मिळते.

    यावर्षी ४८८४ जातीची आणि सिजेन्टा १२ या जातीच्या मिरचीची चार एकर जमिनीत पाच फूट बाय एक फूट या अंतरावर लागवड केली. मिरचीच्या झाडाची उंची आता पाच फुटांपेक्षाही अधिक असून यातून भरघोस उत्पादन निघाले आहे. मिरचीसाठी प्रती किलोमागे सहा रुपये खर्च केला असून आता १८ रुपये प्रती किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे.

    ठिबक सिंचन पद्धतीतून मिरचीबरोबरच हळद, अद्रक, कापूस, गहू, कारली, काकडी आदी पिकांचे भरघोस उत्पादन निघाले आहे. शेतात नेट हाऊस उभारून ॲन्टीव्हायरल नेट लावून कोठलेही कीटकनाशक न वापरता टॉमेटोचे पीक घेण्यात आले आहे. केवळ उत्पादन घेऊन गजानन शांत बसले नाहीत तर राज्यात विविध बाजारपेठेत विविध उत्पादनांना योग्य भाव मिळतो, त्याचाही त्यांनी लाभ घेतला.

    एकंदरित आधुनिक प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि मेहनत यातून भरघोस उत्पादन घेणाऱ्यांपैकी गजानन हे एक युवा शेतकरी असून स्वयंचालित पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान युनिट उभारल्याने श्रम, वेळ आणि पैसा वाचल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.


  • अनिल गडेकर
  • गाड्यांच्या धुरापासून वीजनिर्मिती

    मानवी कल्पनांना कसलेही बंधन व मर्यादा नसते. मात्र त्या प्रत्यक्षात उतरविणे, त्यात यशस्वी होणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्यासाठी जिद्द, चिकाटी महत्वाची असते. याचेच एकय उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वावी या गावचा तरूण राजेंद्र पवार. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मिती करता येऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

    सध्या सर्वत्र ध्वनी, वायू, जल प्रदुषणाने हाहा:कार माजवला आहे. ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणाची हानी यामागील कारणे न संपणारी आहेत. या साऱ्या गोष्टींचा विचार करत असताना या युवकाच्या मनात गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मिती करण्याची कल्पना आली.

    'थ्री इडीयट' या चित्रपटातील रँचो प्रमाणे आपल्यातील शोधक व कल्पक वृत्तीचा वापर राजेंद्रने विधायक कामासाठी केला आहे. राजेंद्र तसा ग्रामीण भागातील सिन्नर तालुक्यातील वावी या गावचा आहे. या परिसरात ना चालायला पक्का रस्ता ना रस्त्यावर दिवे. अशा भागात राहिलेल्या राजेंद्रने पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही, यासाठी गाड्यांमधून निघणाऱ्या धुरापासून वीज निर्मितीचा प्रयोग केलाय. या ऊर्जेचा वापर त्याने गाडीचा ॲव्हेरज वाढविणे, गाडीतील एसी व वायपर चालविणे अशा कामांसाठी केला आहे. तसेच या वाया जाणाऱ्या धुराचा वापर त्याने चक्क मोबाईल चार्जिंगसाठी आणि सिगारेट लायटर मध्येही केला आहे. त्याच्या प्रयोगाची चाचणी चारचाकी गाड्यांसाठी केली जाणार आहे. त्याला या कामगिरीचे पेटंट प्रमाणपत्र ही मिळाले आहे.

    या रँचोची ही कल्पना आपल्या गाड्यांमध्येही उपयोगी पडावी यासाठी अनेक बड्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्याच्या प्रयोगानुसार यंत्रावरील अतिरिक्त भार कमी होतो. हा प्रयोग दुचाकीमध्ये वापरला तरीही फायदा होतो. दुचाकीचे सायलेन्सर लगेच तापते. परंतु या प्रयोगानुसार गाडी सुरू केल्यावरही ते थंड राहते. त्यामुळे सायलेन्सरच्या चटक्यापासून बचाव होऊ शकतो. या सर्वांपेक्षाही महत्वाचे म्हणजे पर्यावरण रक्षण. आपल्या मित्राचा हा फार्म्युला वापरल्याने प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.

    हे सर्व साकारताना राजेंद्रच्या धडपडीला, जिद्दीला कल्पनाशक्तीचे पाठबळ आहे. सध्या शैक्षणिक कर्जावर त्याचे शिक्षण सुरू आहे. इतरही तरुणांनी आदर्श घ्यावा अशीच राजेंद्रची ही जिद्द आणि कल्पनाशक्ती आहे!


  • मोहिनी राणे-देसले, माहिती सहाय्यक
  • 'निसर्ग वाचन'

    कोकणातील दाट वनराईने नटलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्रत्येक वाडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे कार्य सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून केले जात आहे. डोंगराच्या कुशीतील हिरव्यागार परिसराने वेढलेल्या शाळेला भेट दिल्यावर इथल्या शैक्षणिक वातावरणाचा हेवा वाटतो. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नाते जन्मापासूनच जोडले गेले असल्याने पर्यावरण विषयाबद्दल त्यांना अधिक जाणून घेण्याची इच्छा असतेच. सभोवती जंगल असलं तरी त्यात प्राणी नसल्याने वाघोबाची त्यांची भेट तशी पुस्तकातच.

    डिस्कव्हरी, नॅशनल जॉग्राफीक अशा वाहिन्यांपासून दूर असल्याने वाघोबा, कोल्होबा, जंगलचा राजा सिंह, हे सगळे केवळ त्यांच्या गोष्टीतील पात्र. त्यांचं विश्व कसं असेल, ते काय खात असतील, कुठे राहत असतील, असे प्रश्न बालसुलभ मनाला पडणं स्वाभाविकच. त्यांच्या मनातले हे प्रश्न ओळखून रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी येथीली 'पेम' संस्था आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'निसर्ग वाचन' हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

    वरिष्ठ पत्रकार सतिश कामत आणि उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शनिवारी पालकमंत्री महोदयांच्या दौरा कार्यक्रमाच्या निमित्ताने गुहागरला जाताना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशाच एका कार्यक्रमाला उपस्थित राहता आले.

    मध्यान्ह भोजनाची वेळ झालेली तरी 'पिक्चर' पाहायला मिळणार म्हणून बालगोपालांची सेना अगदी शांत बसून होती. काही विद्यार्थी स्वयंसेवक होऊन कार्यक्रमाच्या तयारीत उत्साहाने सहभागी झाले होते. पडद्यावर काय दिसणार याची फारशी कल्पना त्यांना नव्हती. 'जंगलात फिरायला जायचंय' एकाची लाजतच प्रतिक्रिया. सरपंच प्रकाश रांजणे देखील उत्साही. स्वत: पदवीधर असल्याने मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे वेळेपूर्वी तेदेखील हजर झालेले. शाळा व्यवस्थापनाकडून पारंपरिक पद्धतीने स्वागत झाल्यावर कार्यक्रमाला सुरूवात झाली.

    वर्गाच्या खिडक्या बंद झाल्या. अंधारात भितीवरील पडद्यावर प्रकाशझोत आला आणि त्यातून परिवर्तित होणाऱ्या किरणांनी समोरच्या अनेक चकाकणाऱ्या डोळ्यातील उत्सुकता शिगेला गेल्याचे स्पष्ट दिसत होते. कामत यांचे प्रास्ताविक आणि प्रश्न सुरू झाले. वाघ पाहायचा का, जंगलाची सफर आवडेल का, काय पाहिलं ते घरी सांगायचं, लहान टिपण केलं तर पुढच्या महिन्यात परत येईन...आणि एकदाचा माहितीपट सुरू झाला. समोरचे चित्र पाहिल्यावर वाघ..सिंह..अस्वल..ससा..असे शब्द मुलांच्या तोंडातून बाहेर पडत होते. तर एकीकडे कामत यांचे धावते समालोचन सुरू होते. त्यांनी संशोधक डेव्हीड ऍ़टनबरो यांना 'डेव्हीड काका' बनविले. हे डेव्हीड काका..ते बघा वाघाच्या किती जवळ गेले...मांजरीला वाघाची मावशी का म्हणतात...हे प्राणी सायबेरीयातच आढळतात...त्याचे कान पहा कसे हालतात ते...आणि मधूनच फिल्म पॉज करून ते मुलांना प्रश्न विचारित. माहिती देत..पुन्हा फिल्म सुरू...

    पन्नास मिनिटाच्या वेळात मांसभक्षी प्राण्यांविषयी माहिती त्या माहितीपटाच्या माध्यमातून मुलांना मिळाली. हसतखेळत मुलांनी तो माहितीपट पाहिला. अगदी 'एन्जॉय' केला म्हटलं तरी चालेल. माहितीपट संपल्यावर मुलांमध्ये त्यातील प्राण्याविषयी चर्चा सुरू झाली. उपक्रम यशस्वी झाल्याची ती पावती होती. आवडलं का, या प्रश्नाला जोरदार आवाजात 'हो' असं उत्तर मिळालं. मुलांना हसतखेळत निसर्गाची माहिती देणारा हा उपक्रम खुपच सुंदर वाटला. हा उपक्रम सुरू करण्यासाठी डॉ.राजेंद्र जगदाळे यांनी सॉफ्टवेअर दिले आहे तर पुण्याच्या परिमल चौधरी यांनी एलसीडी प्रोजेक्टर आनंदाने दिले. राजवाडी परिसरातील पाच शाळांमध्ये प्रत्येक महिन्याला एक माहितीपट दाखविण्यात येणार आहे.

    वर्गाबाहेर पडतांना आपल्याला आता 'पोटोबा' करायचा आहे, हेदेखील काही क्षण मुले विसरली. नेहमी ताटली घेण्यासाठी रांग लावणारी मुले सिंह काय डेंजर होता...किती बर्फ होता...अशी एकमेकांना प्रतिक्रीय देत होती. चिमुकला आदित्य खुष होता. कारण त्याला वाघोबा भेटला होता. ही भेट घडविण्यासाठीच हा उपक्रम होता.


  • डॉ.किरण मोघे
  • Friday, July 20, 2012

    श्रावणोत्सव...

    निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. आषाढी अमावस्या दीपपूजन तथा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि वातावरणही बदलते. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या 'माणिक मोत्यांचं ' हिरवं स्वप्न फुलू लागतं. शेताच्या बांधावरून 'भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं रं' असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्या उभी राहते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतेच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात...माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट... ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दारापाशी तिच्या येरझऱ्या जणू 'सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया' या तिच्या भावना व्यक्त करीत असतात...आणि इकडे व्रताची तयारी सुरू झालेली असते.

    श्रावण महिना सण-उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो. पहिला श्रावणी सोमवार म्हणून दोन तास आधी सुट्टी मिळाली की आम्ही देखील घरी जाऊन कॅलेंडर पाहून सुट्टयांच्या तारखांची नोंद करायचो. सकाळी उठल्यावर 'सोमवार कोण धरणार आहे?' आईचा प्रश्न...उपवासाच्या पदार्थांची मजा... समुद्र मंथनात तयार झालेले 'हलाहल' त्याने प्राशन केले तो हा सोमवार...या सोमवारला शंकराची पुजा करतात. 

    महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. विशेषत: नवविवाहितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बालकवींनी या आनंदाचे खुप सुंदर वर्णन केले आहे,

    'देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात
    वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत'

    महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. नवविवाहीत महिलांनी पाच वर्षापर्यंत हे व्रत करण्याची परंपरा आहे. अशाच प्रकारे परंपरेने केल्या जाणाऱ्या फासकी व्रतात पसाभर तांदूळ शंकराची पिंड आणि नंदीला वाहतात. 

    सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पुजा, त्यानंतर ओव्या..उखाणे...हळदकुंकू...ओटी भरणं...रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ...त्यानिमित्ताने माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम अनुभवायला मिळतं. मराठमोळा पारंपरिक वेशभूषेतला हा महिलांचा समुह श्रावणातल्या सप्तरंगी आणि आनंदमयी वातावरणाचं जणू प्रतिनिधीत्व करतो.

    शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पुजा करतात. त्याला इजा होऊ नये म्हणून या दिवशी जमीन खणत नाही किंवा नांगर चालविला जात नाही. वारुळाला जावून नागाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. महिला या दिवसाला 'झोकापंचमी' म्हणूनही संबोधतात. म्हणूनच सासुरवाशीण म्हणते-

    'येता वर्षासरी चिंब आठव दाटले ऊरी
    मन वेडे, घेई हिंदोळे, माझीया माहेरी
    पंचमीचा गं बांधुन झुला
    श्रावण आला सखे श्रावण आला...'

    नागपूजनाच्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृतीसाठी चांगले असते आणि ते झाल्यानंतर झिम्मा, फुगडी आणि वडाच्या पारंब्यावरचे झोके... हा सण शेतीप्रधान संस्कृतीचे द्योतक असल्याने नागाचे महत्व लक्षात घेऊन अंधश्रद्धांना बळी न पडता या सणाची खरी पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच बदलत्या परिस्थितीत नागपंचमीचे व्रत करतांना नागाचे रक्षण करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.

    शुक्ल पक्षातील पौर्णिमेला 'नारळी पौर्णिमा' म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण. ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा 'समिंदराला' या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे.

    महिलांसाठी या दिवसाचे खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. या सणाच्या निमित्ताने सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसेच अनाथालयातील मुले, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न या सणाच्या निमित्ताने करता येतात.

    शिळसप्तमीची अग्नीदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपाने पुजा झाली की 'गोविंदा आला रे आला..' चा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धमाल आणि बच्चेकंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ...गोविंदा पथकाचा पराक्रम... त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसते उधाण येते. 'हम भी कुछ कम नही' हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही महानगरात मनोरे रचून दहीहंडी फोडतांना दिसतात. काळानुसार उत्सवाचे स्वरूप व्यापक होत असले तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची काळजी मात्र सर्वांनीच घ्यायला हवी.

    श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावस्या. आईच्या हाताचं वाण घेतांना लहानपणी मजा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठी हा सण महत्वाचा असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या 'जिवा-शिवाच्या' बैलजोडीला विश्रांती देण्याचा दिवस, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचे, अंगावर झुल चढवायची आणि सायंकाळी सवाद्य मिरवणूक...गाव त्यानिमित्ताने एकत्र येतो. खान्देशात पुरणपोळीऐवजी खापरावरचे मांडे करण्याची पद्धत आहे. ताज्या दुधाबरोबर मांड्यांची चव काही वेगळीच असते. 

    श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पीकाची राखण सुरू होते. गावातील मंदिरात सुरू झालेले श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते. माहेरवाशीण मंगळागौर आटोपून सासरी परतते आणि गौरी गणपतीच्या तयारीला लागते. नव्या उत्सवाचे नवे रंग...आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे. आनंद देणं आणि घेणं हे तिचं मूळ आहे. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सुत्रात बांधतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.


  • डॉ. किरण मोघे 
  • Thursday, July 19, 2012

    अपंगांसाठी झटणारे हात

    अपंगांसाठी झटणारे हात

    श्रावण सरी

    सृष्टीने रानफुलांची कोवळ्या किरणांनी विणलेली सुंदर भरजरी किनार असलेला हिरवा शालू नेसताच श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागते. विशेषत: महिलांना आणि तरुणाईलाही हा महिना मनापासून आवडतो. लहानपणी मात्र आम्हाला ओढ असायची ती विविध व्रतांच्या वेळी देवाला दिल्या जाणाऱ्या नैवेद्याची, त्या व्रतांच्या गोष्टी आईच्या मांडीवर बसून ऐकण्याची, उनपावसाच्या खेळात सामील होण्याची आणि घरात पंचमीला होणारे उकडीचे कान्नोले तसेच पोळ्याच्या दिवशी होणाऱ्या पुरणपोळीची... एकूणच काय तर 'आनंद' आणि 'उत्साह' हे दोन शब्द जणू या महिन्याशीच जोडले गेले आहेत.

    कोकणातील श्रावणाची मजाच काही वेगळी असते. हिरव्या डोंगररांगा...मधूनच कोसळणारा शुभ्र धबधबा...चकाकणाऱ्या पानांवर नृत्य करणारी कोवळी सोनेरी किरणे...प्राणी आणि पक्षांचा मुक्त विहार...ग्रामदैवताच्या मंदिरातून निघणारी पालखी...शिवमंदिरातील अभिषेक...आणि स्वर्गलोकातून घेऊन जाणारी कोकणकन्या अर्थात कोकण रेल्वेतील प्रवास...वेड्यावाकड्या रस्त्यावरून मनसोक्त भटकंती करायची आणि कडेला डोंगरावरून खाली कोसळणाऱ्या प्रवाहात चिंब होत पुढे जायचे...धमाल असते. ठिकठिकाणी दिसणारे विविधरंगी पक्षी या उत्साहात भर घालतात.

    श्रावण सुरू होताच स्वयंपाक घरातील मेनूदेखील बदलतो. या ऋतूत आरोग्याच्या दृष्टीने कांदा, लसूण किंवा अधिक मसालेदार पदार्थ वर्ज असतात. म्हणूनच चार्तुमास सुरू झाला की स्वयंपाक घरातून या पदार्थांच्या अधिकृत 'बंदिची' घोषणा आई परंपरेने करते. शुद्ध शाकाहारी भोजनासोबत पुरणपोळी, खानदेशात मांडे, उकडीचे दिवे किंवा कान्नोले, मंगळागौरीला करंज्या आणि मुगाच्या डाळीची अळणी खिचडी, नागपंचमीची गव्हाची खीर, शिळ सप्तमीच्या पुऱ्या किंवा बुंदी घातलेले ताक, पोळ्याच्या दिवशी वाणाच्या पुऱ्या अशा पदार्थांमुळे बालगोपाळांची मात्र चंगळ असते.

    संपूर्ण महिना आनंदात कधी सरतो हे कळत नाही. श्रावणातील सौंदर्य आणि वातावरणाशी समरस होणाऱ्या भावना कवितेतून तसेच गीतातून प्रकट झाल्या आहेत. मराठीतील बालकवी यांची 'श्रावणमासी हर्ष मानसी' ही कविता, गंगाधर महांबरे यांचे 'वायुसंगे येई श्रावणा, जलधारांची छेडीत वीणा', मंगेश पाडगावकर यांचे 'श्रावणात घननिळा बरसला', ग.दि.माडगुळकर यांचे 'श्रावण आला गं वनी श्रावण आला' किंवा 'घनघन माला नभी दाटल्या..'अशी अजरामर गीते ओठावर अलगद येतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील 'सावन के झुले पडे..', 'सावन का महिना पवन करे सोर..', 'रिमझीम गिरे सावन', 'आया सावन झुमके' आदी गितांनी अनेकांना आपल्या प्रेमात पाडलंय. अशा कविता आणि गीतांचे स्वर कानावर पडताच चैतन्याच्या या बहराला सुंदर सोनेरी किनार मिळते.

    भारतीय शास्त्रीय संगीतातही श्रावणातले हे स्वर टिपलेले आहेत. या ऋतुतील खास रचना प्रकृतीशी समरस होण्याला पूरक ठरतात. मल्हार रागातील विविध प्रकार, मधमात सारंग, देस यासारख्या शास्त्रीय आणि सावनी, कजरी, झुला अशा उपशास्त्रीय प्रकारातील सुरावटी वातावरणातला उत्साह वाढवितात. 'कैसे भाए सखी ऋत सावनकी, पिया भेजी न पतीया आवनकी' ही मिया मल्हारमधील चीज किंवा 'सावनकी ऋत आए री सजनी प्रितम घर नही आए' ही कजरी प्रकारातील रचना मैफीलीची रंगत वाढवितात. उत्तर भारतात 'झुलना झुलाओरी अंबुआ के डाल पर कोयल बोले रामा, कुंवर कन्हैय्या संग छबेली राधा रंग भरो है न्यारो रामा' असा 'झुला' गायला जातो. बरसत्या पावसात भिजण्याएवढाच आनंद या सुरांमध्ये चिंब होताना मिळतो.

    श्रावणात दिसणारी इंद्रधनुष्य जणू या महिन्यातील सृष्टीची विविध रुपे आणि माणसाच्या मनातील आनंदाच्या तरंगांना प्रकट करणारा असतो. एखाद्या छायाचित्रकारासाठी निसर्गाचे ते रुप आकर्षण असते तर निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यातील भटकंतीची मजा महत्वाची. श्रावण एकीकडे सर्वांना ऐक्याच्या सुत्रात बांधतो. तर एकटेपणाचा अनुभव घेणाऱ्याच्या मनात प्रेमाची आशाही जागवतो. प्रत्येकासाठी या महिन्यात काहीतरी विशेष आहे. निसर्गाने दोन्ही हात मोकळे करून केलेली सौंदर्याची ही उधळण मनसोक्त अनुभवतांना श्रावणाकडून आनंद घ्यावा, उत्साह घ्यावा, वेगवेगळे रंग घ्यावे, ताजेपणा घ्यावा...आणि हो, स्वत:जवळ आहे ते इतरांना देतांना मुक्तपणे देण्याची वृत्ती तसेच निराशेच्या अंध:काराला मागे सारत नव्या दिवसाला सामोरे जाणाऱ्या किरणांचं तेजही जरूर घ्यावं...अगदी मोकळ्या मनाने घ्यावं...मनाची सर्व कवाडे बाजूला सारावी आणि पाहावं या श्रावणाने आपल्यासाठी काय आणलं ते?

  • डॉ.किरण मोघे 
  • Tuesday, July 17, 2012

    व्यवसायामुळे ओलांडली दारिद्र्यरेषा

    दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटूंबाला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याची किमया सुवर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजनेने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे घडवून आणली आहे. या योजनेमुळे उपलब्ध झालेल्या रोजगारातून संतोष रायजी हिंगमीरे या बेरोजगार तरुणाने दरमहा दहा हजार रूपयांपर्यंत उत्पन्न मिळवून दारिद्र्यरेषा ओलांडली आहे.

    यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे राहत असलेल्या संतोष हिंगमीरे यांचे कुटूंब दारिद्र्यरेषेखाली होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याची त्यांची मनोमन इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू ठेवले होते. प्रथम किराणा दुकानात सामान्य नोकर म्हणून त्यांनी नोकरी स्विकारली. यातून त्यांना जेमतेम वेतन मिळू लागले. परंतु या व्यवसायाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना भविष्यात उपयोगी पडली. आठवड्यातला एक दिवस सुटी असल्याने त्यांनी या सुटीच्या दिवशी ग्राहकांना घरपोच किराणा माल पोहचविण्याचे काम सुरू केले. यामधूनच त्यांना किराणा माल घरपोच पोहचविण्याचा सेवा उद्योग स्वत: सुरू करण्याची संकल्पना सूचली.

    नगर परिषदेमार्फत हिंगमीरे यांनी सन २००३ मध्ये ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले. सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना घरगुती कामे करण्यास वेळ मिळत नाही, अशा गरजू ग्राहकांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून किराणा मालाची यादी घेऊन तो माल दुचाकीने ते घरपोच पोहचवू लागले. सुरूवातीला त्यांनी १५ ग्राहकांकडे ही सेवा सुरू केली. प्रामाणिक व मनमिळावू वृत्तीमुळे त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

    या घरपोच सेवा उद्योगासाठी त्यांना भारतीय स्टेट बँकेच्या उमरखेड शाखेने सन २००५ मध्ये ६० हजार रुपये कॅश क्रेडीट लोन दिले. कर्जाची परतफेड नियमितपणे सुरू असल्याने बँकेचा विश्वास वाढला. त्यामुळे सन २००७ मध्ये याच बँकेने अतिरिक्त ४० हजार रुपये कर्ज दिले.

    या सर्व परिश्रमामुळे आज हिंगमीरे यांचे उमरखेड शहरात स्वत:चे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या कामकाजात त्यांची पत्नी हातभार लावते. त्यांची दोन मुले व एक मुलगी शिक्षण घेत आहेत. या घरपोच किराणा माल सेवा उद्योगामुळे हिंगमीरे यांना महिन्याला सात हजार रुपये तसेच किराणा दुकानात विक्री होणाऱ्या मालातून तीन हजार रुपये असे एकूण १० हजार रुपये मिळतात.

    प्रारंभी केवळ बाराशे रुपये उत्पन्न असलेल्या हिंगमीरे यांनी शासकीय योजनेच्या मदतीमुळे आणि स्वत:च्या परिश्रमाने दरमहा दहा हजार रुपये उत्पन्नापर्यंत मजल मारली असून यामुळे त्यांच्या कुटुंबाने दारिद्र्यरेषा ओलांडली आहे.

    कोकमची बाग

    साता समुद्रापार पोहोचलेली कोकम कढी अर्थात सोलकढी ज्या फळापासून तयार केली जाते असे बहुगुणी कोकमाचे कोकणात प्रामुख्याने पीक घेतले जाते. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात कोकमची झाडे नारळ, सुपारीच्या परसबागा या डोंगर नदी किनारी नैसर्गिकरित्या वाढलेल्या आढळतात. या झाडांची लागवड शास्त्रीय पध्दतीने केल्यास शेतक-यांना त्याचा फायदा होतो यासारख्या अनेक बाबींची मला माहिती होती पण हे सारे पुस्तकी ज्ञान. प्रत्याक्षात कोकमचे झाड कसे असते याला फळ कसे येते असे नानाविध प्रश्न मनात होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याची आयतीच संधी मिळाली. खास या विषयाची माहिती घेण्यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हयाचा पाहणी दौरा केला.

    खरंतर कोकम हे सतत हिरवेगार असलेले झाड आहे. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये विषुवृत्तीय हवामान असलेल्या भागात हे झाड वाढतांना दिसून येते. पश्चिम घाट, कूर्ग, वेनाड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात या पिकांपासून पारंपारिकरित्या उत्पन्न घेतले जाते. सिंधुदुर्गात बहुतांश शेती व बागायती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.या भागात काळाची गरज म्हणून कोरडवाहू फळझाड लागवड करणे फायदयाचे ठरते.

    सिंधुदुर्गात आजपर्यंत कोकमची लागवड बियांपासून केली जात असे. परंतु, कोकण कृषी विद्यापीठाने या पिकाची मृदुकाष्ट कलमाव्दारे अभिवृध्दी करण्याची पध्दत प्रमाणित केल्यापासून आता या पिकांची कलमे तयार करणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने कोकमची अमृता कोकम, कोकम हातिष या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. विद्यापीठामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये या जातीची कलमे उपलब्ध आहेत. फळातून बिया काढल्यानंतर स्वच्छ धुवून प्लॅस्टिकच्या माती आणि शेणखत ३.१ या प्रमाणात घेऊन भरलेल्या पिशवीत रुजत घातली जातात. बिया रुजत घालण्यापूर्वी दोन दिवस पाण्यात भिजत ठेवल्यास रुजवा लवकर तयार होतो. कोकमची रोपाव्दारे लागवड करावयाची असल्यास १ वर्षाची रोपे जमिनीत कायमच्या ठिकाणी लागवड करण्यासाठी वापरण्यात येतात. कोकमच्या रोपांमध्ये साधारणत ५० टक्के नर व ५० टक्के मादी रोपे तयार होतात.म्हणून खात्रीशीर व चांगल्या जातीची रोपे लावण्यासाठी कलम पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात भेट किंवा मृदुकाष्ट कलमे केल्यास मोठया प्रमाणात यशस्वी होतात.

    कोकमच्या लागवडीसाठी मे महिन्यात शेतातील किंवा डोंगरातील झाडे-झुडपे काढून टाकली जातात. दोन रांगांतील अंतर ७ मीटर तसेच २ झाडातील अंतर ७ मीटर राहील यानुसार चांगले खड्डे खणले जातात. त्यानंतर शेणखत व माती यांच्या चांगल्या मिश्रणाने हे खड्डे बुजवून घेतले जातात.पावसाळ्याच्या सुरुवातीस सुधारित कोकमच्या कलमांची निवड करून लागवड केली जाते. सुरुवातीला काही महिने लागवड केलेल्या रोपांना काठीचा आधार दयावा लागतो. सिंधुदुर्गात आंब्यांच्या, काजूच्या किंवा नारळाच्या बागेत आंतरपीक म्हणूनही कोकमच्या सुधारित जातींची लागवड शक्य आहे. शेतक-यांनी पारंपारिक दृष्टीकोन बाजूला ठेवून कोकम उद्योगाकडे एक फायदेशीर व्यवसाय म्हणून पहाणे आवश्यक आहे.

    बाजारात कोकम फळापासून मिळणा-या अनेक पदार्थांना चांगला भाव आला आहे. घाऊक बाजारामध्ये हिरवी कोकम फळे सुकवून तयार केलेले दोडे ३० रुपये किलो,प्रक्रिया न केलेले कोकम ५० रूपये किलो, कोकम बी ७० रुपये किलो, कोकम, आगूळ ६० रूपये लीटर, प्रक्रिया केलेले कोकम ६० रुपये किलो या दराने विकत घेतले जाते. अशा प्रकारे कोकम हे एक प्रकारे शेतक-यांना वरदान ठरणारे असेच फळ आहे.याची शास्त्रीय पध्दतीने लागवड केल्यास त्याचा फायदा नक्कीच शेतक-यांना होवू शकतो.

    कोकम हे फळ बहुपयोगी असून मानवी आहारात व औद्योगिक क्षेत्रात त्यास महत्व प्राप्त झाले आहे. आहारामध्ये कोकम फळाचा उपयोग प्रक्रियाकरून चिंचेप्रमाणे भाजी,आमटी, रस्सा, सोलकढी तसेच मत्स्यहारामध्ये केला जातो. हिरव्या कोकम फळाचे दोन ते चार तुकडे करून वाळविले जातात. तसेच पक्व कोकम फळाच्या वाळलेल्या सालींवर पारंपरिकरित्या प्रक्रिया करून कोकम सोलल तयार केले जाते. या कोकम सोलला बाजारात चांगली मागणी आहे. पक्व फळापासून कोकम सरबत हे स्वादिष्ट पेय तयार करता येते. सिंधुदुर्गात पर्यटन व्यावसायिकांकडून पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी कोकम सरबतचा सर्रास वापर केला जातो. कोकम सोलपासून तयार करण्यात येणा-या कोकम कढीने तर कोकणचे नाव साता-समुद्रापार नेले आहे.

    कोकम हे फळ काही ठिकाणी मासे टिकविण्यासाठी, रबराचा चिक गोठविण्यासाठी आणि टॉनिक तसेच इतर औषधे बनविण्यासाठी वापरले जाते. त्यात असणारी आम्ल द्रव्ये पोटाचे विकार, अंगदुखी, ह्दय रोग यावर परिणामकारक असतात. कोकमाच्या बियांमध्ये २६ ते २७ टक्के इतके तेल असते. या तेलाला कोकम बटर असे म्हंटले जाते. ते नेहमीच्या तापमानाला मेणासारखे घट्ट रहाते. ग्रामीण भागात कोकमच्या बियांपासून निघणा-या तेलाचे मुठयालल तयार करून वापरले जाते. या तेलाचा उपयोग उद्योगक्षेत्रात चॉकलेट, मिठाई निरनिराळी औषधे, मलमे आणि सौंदयप्रसाधने तयार करण्यासाठी वापरतात. थंडीमध्ये ओठ, हात, पाय फुटू नयेत म्हणून या तेलाचा ग्रामीण भागात उपयोग केला जातो. तेल काढून उरलेली पेंड जनावरांचे खाद्य म्हणून वापरात येते. कोकम तेल निर्यात करून परकीय चलन मिळविण्यासाठी कोकम लागवड चांगला हातभार लावू शकेल.


  • संध्या गरवारे
  • कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर

    रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर भारतातील मोजक्या सूर्य मंदिरापैकी एक आहे. सौराष्ट्रातील वेराळजवळ प्रभासपट्टण येथे प्राचीन सूर्यमंदिर आहे. त्याचबरोबर कोणार्क (ओरिसा) तसेच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यात निवडक सूर्य मंदिरे पाहायला मिळतात. या श्रृंखलेतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले सूर्यमंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी गावात आहे.

    पावसपासून १८ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. इथली सूर्यनारायणाची मूर्ती ९०० वर्षापूर्वीची आहे. मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात दंतकथा प्रचलित आहे. काठेवाडीतील वेराळ बंदरातून मालवाहू नौकेत ही मूर्ती होती. कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्याने नावाड्याने मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली आणि जहाज सुरू झाले. गावात राहणाऱ्या कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला 'देवाची खोली' नाव पडले आणि कनकेचा आदित्य (सूर्य) म्हणून यास 'कनकादित्य' असे संबोधले जाते. कनकादित्याची काळ्या पाषाणातील मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे.

    बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्यचे पुजारी होते. त्यांची किर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहारराजा शके १११३ मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्रस्नानासाठी कशेळीला आला असताना त्याने ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिला, असे वर्णन करणारा ताम्रपट मंदिरात आहे. ताम्रपटातील तारखेवरून त्याविषयी विविध मते व्यक्त करण्यात येतात. मंदिराचा परिसर शांत आणि रम्य आहे. जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरे तेवढीच सुंदर आहेत. मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात लाकडावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हा आकर्षक सभामंडप बांधून दिला,असा उल्लेख येथे पाहायला मिळतो. मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीरदेखील भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभोवती चिरेबंदी पोवळी आहे. देवालयाच्या छतावर तांब्याचा पत्रा आहे. उत्सवासाठी एका बाजूला मंच असून उत्सवात विविध कार्यक्रम येथे होतात. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराजवळील तुळशीवृंदावनाची रांग मंदिराच्या पवित्र्यात भर घालणारी आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्यावेळी कशेळी गावाला भेट दिल्याचे स्थानिकांकडून ऐकायला मिळते. बॅ.नाथ पै यांच्या सभा मंदिर परिसरात झाल्याचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आवर्जुन सांगतात. माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असा पाच दिवस रथसप्तमीचा उत्सव मंदिरात थाटात होतो. यावेळी सभामंडपाची सजावट नजरेत भरण्यासारखी असते. मंदिराचे विश्वस्त आडिवरे येथील महाकालिला प्रथम आमंत्रण देतात. आडिवरे येथील खोत मंडळी देवीला वाजतगाजत कशेळीला आणतात. माघ शु. षष्ठीला आडिवरेची महाकाली मध्यरात्रीपर्यंत कशेळीला येते. कशेळीचे ग्रामस्थ तिचे स्वागत करतात. रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी विधीवत पूजा होऊन उत्सवाला सुरूवात होते. उत्सवा दरम्यान कीर्तन, प्रवचन, पालखी, प्रदक्षिणा, नाटक आदी विविध कार्यक्रात परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात.

    शांत आणि रमणीय परिसरात मंदिर उभारले असल्याने येथे आल्यावर भाविकांचे पाय सभामंडळात रेंगाळतात. कनकादित्याच्या तेजोमय मूर्तीचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं. मंदिराच्या आवारात असणारी मोकळी हवा या आनंदात भर टाकते. शुद्धता आणि पावित्र्याचा मंत्र घेऊनच भाविक परतीच्या प्रवासला लागतात.


  • डॉ.किरण मोघे
  • Monday, July 16, 2012

    Ajitdada Pavar

    संगीताला गवसला लाख मोलाचा सूर…

    मेंढपाळ म्हटले की रानावनात भटकणारा असे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. इतकेच नाही तर शेळी-मेंढी पालन ही पुरुषांचीच मक्तेदारी आहे, असेही समजले जाते. या मक्तेदारीला अमरावती जिल्ह्यातील संगीता ढोके या विद्यार्थिनीने छेद दिलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करुन अर्धवट सुटलेले शिक्षण तर तिने पूर्ण केलेच, शिवाय या व्यवसायातून वर्षाकाठी ६० लाख रुपयांची उलाढाल करून अनेक महिलांना रोजगारही दिला आहे.

    शेतीला पूरकन व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, गाई-म्हशी पाळणे, भाजीपाला लागवड याकडे पाहिले जाते. अलीकडे यात शेळी-मेंढी पालनाची भर पडली आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील लाडकी (बु.) या गावाच्या ढोके परिवाराचा शेळी-मेंढी पालन हा पारंपरिक व्यवसाय परंतु जगन्नाथराव ढोके यांनी शेळी-मेंढी पालन बाजूला सारुन पत्रकारिता, एक छोटे किराणा दुकान व घर बांधकामासाठी लागणाऱ्या बांबूफळ्यांचा व्यवसाय सुरु केला. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कुटुंबाचा गाडा कसाबसा चालला होता. तथापि ढोके यांचे अकाली निधन झाले. परिणामी येणारा पैशाचा ओघही थांबला.

    संगीता ही भावंडापैकी थोरली असल्यामुळे वडिलांच्या निधनानंतर कुटुंबप्रमुखाची जबाबदारी संगीतावर आली. एकीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह तर दुसरीकडे बहीण-भाऊ व स्वत:च्या शिक्षणाचा खर्च या वैचारिक, मानसिक संघर्षातून ती जाऊ लागली. या अवघड परिस्थितीत तिने कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. त्या व्यवसायातही तिला अपयश आले, ते अपयश पचवून परिस्थितीपुढे हतबल न होता तिने शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. सुरुवातीला थोडेफार पैसे जुळवून पाच शेळ्या विकत घेतल्या. रानावनात न भटकता तिने घरच्या घरीच शेळ्यांची देखभाल केली. तीन वर्षातच २० शेळ्या झाल्या. त्यानंतर मात्र पुरेशा भांडवलाअभावी शेळ्यांकरिता निवारा बांधणे तिला शक्य नव्हते. त्यातूनही मार्ग काढत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी-मेंढी विकास महामंडळाकडून तिने तीन लाखांचे अर्थसहाय्य घेतले. त्यातून शेळ्यांकरिता उत्तम निवारा उभा केला. शेळ्यांना गोठ्यात वावरताना नैसर्गिक वाटावे म्हणून तिने गोठ्यातले बांधकाम दगड, झाडे, लोखंडी बार यांच्या साहाय्याने केले.

    शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर केंद्राच्या पॅकेजअंतर्गत तालुक्यातील काही बचतगटांना शेळ्या विकत घेण्याकरिता अनुदान देण्यात आले. त्या बचतगटांना संगीताने काही शेळ्यांची विक्री केली, तर स्वत:करिता काही छोटी पिल्ले विकत घेतली. ती पिल्ले मोठी झाल्यावर त्यांचीही विक्री केली. छोटी पिल्ले विकत घ्यायची व ती मोठी झाल्यावर विकायची. यातून संगीताकडे भांडवल खेळत राहू लागले. एकीकडे आर्थिक भरभराट होत असतांना दुसरीकडे तिने पाच एकर बागायती शेती खरेदी केली. शेतीत स्वत: राबून जमीनही कसून घेतली. संगीताची जिद्द व कामावरची निष्ठा बघून शेळी-मेंढी महामंडळाने व्यापारी कार्यक्रमांतर्गत शेळ्यांचे पुरवठादार म्हणून तिला कंत्राट दिले. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, भंडारा, नागपूर व वर्धा या सहा जिल्ह्यांत शेळी-मेंढी पुरवठा करण्याचे संगीताचे काम आता नियमित चालू आहे. यातून ती वर्षाकाठी तब्बल ६० लाख रुपयांची उलाढाल करतेय, शिवाय याद्वारे तिने अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

    शेळीपालनाचे कोणतेही शास्त्रोक्त शिक्षण संगीताने घेतले नसले तरी, शेळ्यांचे आजार, औषधोपचार, चारा, गाभण शेळ्या व दुभत्या शेळ्यांची विशेष काळजी याविषयीची सर्व माहिती तिने आत्मसात करुन घेतली. शेळी वर्षातून तीन वेळा पिलांना जन्म देते. पिल्लू १५ महिन्याचे होताच ते त्याच्या पिलांना जन्म द्यायला सक्षम होते. त्यामुळे शेळ्यांचे उत्पादन सतत सुरुच असते. शेळीची कातडी, हाडे, यांना चांगली बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात कोणताच तोटा होत नाही. शिवाय शेळ्यांपासून मुबलक प्रमाणात मिळणारे सेंद्रीय खत शेतीला पोषक ठरते, याचीसुद्धा संगीताला कल्पना आहे. मुत्राचा निचरा व्यवस्थित केल्यास आजूबाजूचा परिसर कोरडा राहण्यास मदत होते. त्यामुळे जनावरांचे आजारही बहुतांश दूर होत असल्याचे संगीता सांगते. बाजारात शेळीच्या कातडीला चांगली मागणी आहे. वाद्य साहित्य व चामड्याच्या महागड्या पर्स बनविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. रक्त शुद्धीकरणासाठी शेळीचे दूध उपयुक्त आहे. अशा विविध उपयोगांमुळे शेळी उपयुक्त आहे.

    ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरीसाठी शहराकडे जाण्यापेक्षा गावात थांबून शेतीच्या जोडीला शेळीपालन व्यवसाय केल्यास त्यांना पगाराइतकेच किंबहुना त्याहून अधिक उत्पन्न मिळू शकते, असे संगीताचे अनुभवातून तयार झालेले मत आहे. भविष्यात उस्मानाबादी, बोअरक्रॉस, शिरोही (राजस्थानी) अशा प्रजातीच्या ५०० ते १००० शेळ्या व बोकडांचे संगोपन करण्याचा तिचा मानस आहे. शेळीपालनाचा व्यवसाय करुन संगीता एवढ्यावरच थांबली नाही, तर ग्रामीण भागातील शेतीवर चालणारे उद्योग शासनाच्या योजनांची माहिती व बचतगटांच्या महिलांकरिता त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तिने झरा या सामाजिक संघटनेची स्थापना केलीय. या संघटनेअंतर्गत भटके विमुक्तांसाठी लढा, भटक्यांना खुले चराईक्षेत्र, निसर्ग संसाधनात वाटा, हक्काचा विकास निधी, गुराख्यांना गुरे चारण्याचे अधिकार, पशूंकरिता मुबलक पाण्याचा साठा, शासनाच्या पशुविषयक यादीमध्ये मेंढ्या-बकऱ्यांचा समावेश तसेच वित्तीय सहायता, पशुविमा, त्यांचे प्रजनन, फिरती पशुचिकित्सा सेवा, औषधी व पशू उत्पादनाची वितरण व्यवस्था सशक्त करण्यासाठी संगीता प्रयत्न करतेय.

    संगीताने शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून कुटुंबाला आधार दिलाय. कधीकाळी विस्कटलेल्या आर्थिक घडीमुळे अर्ध्यावर सोडावे लागलेले स्वत:चे शिक्षण पूर्ण करायला मात्र ती विसरली नाही. संगीताने मुक्त विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या पदवी शिक्षणक्रमाला प्रवेश घेतला. समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत स्वीकारुन तिने आपल्या धारदार लेखणीतून अनेकांना न्याय दिला आहे. त्यासोबतच रुढी-परंपरेने जखडून ठेवलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे करुन सामाजिक चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागही नोंदविला आहे.

    आर्थिक सामर्थ्य मिळवून देणारा समर्थ बचत गट

    आमच्या बचत गटाच्या महिलांनी केलेल्या जेवणाचा एकदा आस्वाद घेतला की, तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्या जेवणाची आठवण करणारच. आमच्या बचत गटामुळे वीस कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. गटातील महिला आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्या असून त्यामुळे गटाचे नावच अधोरेखित झाले आहे. समर्थ महिला बचत गटाच्या अध्यक्षा मालती यादव सांगत होत्या.

    कोल्हापुरातील शाहू मिल परिसरातील मालती यादव यांनी १० मार्च २००५ रोजी महिला बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या बचत गटात वीस सदस्य असून यशश्री गायकवाड या उपाध्यक्षा तर वंदना पाटील या सचिव आहेत. यादव यांनी सुरुवातीला प्रत्येकी १०० रुपये दरमहा गोळा करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे दरमहा दोन हजार रुपये जमा होऊ लागले. यातून सदस्यांच्या सहकार्याने यादव यांनी केटरींगची ऑर्डर घेण्यास सुरुवात केली.

    कोल्हापूर आणि मटणाचे जेवण यांचे अतूट नाते आहे. मांसाहारामध्ये रूची असणारा कोल्हापूरला गेलेला पाहुणा व्यक्ती देखील येथील तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव घेतल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूरकरांची ही आवड ओळखून या बचत गटाने केटरींगचा व्यवसाय निवडला. बचत गटाच्या माध्यमातून जेवण बनवण्याचा व्यवसाय जोम धरू लागल्याने कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटणाचे जेवण तयार करण्यासाठी यादव आणि त्यांच्या सर्व सहकारी स्वत: कष्ट घेतात. समर्थ महिला बचत गटाचे जेवण म्हटले की, खवय्यांची गर्दी होते. श्रीमती यादव यांना बँक ऑफ इंडियाचे प्रशिक्षण, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय येथील विविध बैठका, प्रशिक्षण कार्यक्रमात आवर्जून भोजन व्यवस्था करण्यासाठी सांगितले जाते.

    सुरुवातीला प्रत्येक सदस्यांकडून १०० रुपये गोळा केले जात होते. आता सदस्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली असून प्रत्येक सदस्यांकडून २०० रुपये गोळा केले जातात. यातून जमा होणारा निधी व्यवसायाबरोबरच बचत गटातील सदस्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वापरला जातो. त्यांना एक सक्षम आर्थिक आधार निर्माण झाल्याचे मालती यादव सांगतात.

    समर्थ बचत गट भीमथडी, पवनाथडी, वारणा कृषी प्रदर्शन, सातारा महोत्सव, कृष्णाई महोत्सव अशा विविध महोत्सवात सहभागी झाला आहे. त्या-त्या महोत्सवात आता ग्राहक दरवर्षी आमचा स्टॉल शोधत येतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात, असे यादव आवर्जून सांगतात.

    बचत गटाने आता भांडवली गुंतवणूक केली आहे. किमान २०० लोकांना जेवण पुरवू शकेल इतकी साधनसामग्री घेतली आहे, अशी माहितीही श्रीमती यादव यांनी दिली. बचत गटाने वैनगंगा-कृष्णा ग्रामीण बँकेतून कर्ज घेतले आहे. मोठ्या प्रमाणावर भोजन व्यवस्था करावयाची असल्यास कर्जातून ठराविक रक्कम काढली जाते. त्याचबरोबर सर्व सदस्यांकडून पैसे घेऊनही एखाद्या कामासाठी निधी उभारणी केली जाते. संबंधित कामाचे पैसे मिळाल्यावर झालेला नफा बचत गटाच्या खात्यावर जमा करुन उर्वरित रक्कम सदस्यांना परत दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

    बचत गटातील सहभागामुळे मुलांचे शिक्षण व्यवस्थित होऊ लागले आहे. आमच्या अर्थिक अडचणींवर आम्ही मार्ग काढण्यास समर्थ झालो आहोत, असे गटातील सदस्य महिलांचे म्हणणे आहे.

    Saturday, July 14, 2012